दिसामाजी काहीतरी

प्रवर्ग: श्रीनिवास याडकीकर

जाज्वल्य

हा लेख आमचे मित्रवर्य पंडित श्रीनिवास याडकीकर-नगरकर यांनी लिहिला आहे. त्यांचे ‘राधा – एक आभास’ हे पुस्तक तसे पूर्वीपासूनच गाजते आहे.. पण त्याव्यतिरिक्त केलेल्या फुटकळ लेखात त्यांनी आमचा समाचार घेतला. काही सत्य काही विपर्यास… विनोदी समजून घ्यावा…(त्यांचे लिखाण येथून प्रसिद्ध होते – http://shabdanvachun.wordpress.com/)
—————————————————————————

आपल्या “मुंबईकर-पुणेकर-नागपूरकर” ह्या लेखात पु. ल. म्हणतात, “जर तुम्हाला पुणेकर व्हायचे असेल तर खुशाल व्हा, फक्त तुम्हाला कुठल्या न कुठल्या तरी गोष्टीचा साधासुधा नाही तर जाज्वल्य अभिमान असावा..” पहिल्याने पुण्यात आल्यावर असा कोणी ‘जाज्वल्य’ अभिमान असणारा कोणी भेटेल कि नाही ह्याविषयी शंका (किंबहुना धास्ती जास्त!) होती. पण निखील शेठ्ला भेटल्यावर हि शंका फिटली. खरेतर निखीलला पहिल्यांदा कधी भेटलो हे नीटसे आठवत नाही.. शेठ ह्या मनुष्यप्राण्याचा (मनुष्य-प्राणीच म्हटलेले बरे!) पहिला ज्ञात उल्लेख (हि हिस्ट्री क्लबमध्ये बेल्लारीकर, शेठ आणि स्मित ह्या त्रयीने लावलेली सवय…) मी एस. वाय. ला पहिल्या सेमिस्टरमध्ये असतानाचा! बेल्लारीकर ह्या कधीही न ऐकलेल्या आडनावाच्या आणि कधीही न पाहिलेल्या माणसाशी माझी गाठ घालून देण्यात आली होती. इतिहास, गणित, सिनेमा अश्या पाच-पन्नास गल्ल्यामधून बेल्लारीकर मला फिरवत होता. आणि मी वाघाच्या गुहेत सापडलेल्या पाडसासारखा झालो होतो (आज तीच गुहा अल्लीबाबाच्या गुहेसारखी वाटते.. असो!) अचानक बेल्लारीकारचा फोन वाजला. “शेठचा फोन आहे एक मिनिट हं!” असे बोलून बेल्लारीकर ने फोन घेतला. आणि मग बेल्लारीकर आणि शेठचे पेशवाई वरचे संभाषण सुरु झाले.

हळूहळू माझा क्लबमधला वावर आणि इतिहासाचा माझ्यातला संचार दोन्ही वाढू लागले. लवकरच मी आणि विक्रांत हांडे-देशमुख यांनी सिकंदरावर व्याख्यान द्यावे असे ठरले. रात्रभर जागून मी प्रेझेन्टेशन बनवले होते.. उरलेले काम करायला मी स्मितच्या रूमवर गेलो. तिथे सावळ्या वर्णाचा आणि हिस्ट्री क्लब मधल्या इतर सदस्यांच्या तुलनेने एक अंमळ भरघोस अंगाचा तरुण (किमान दिसण्यावरून तरी) माझ्या प्रेझेन्टेशनशी झगडा करीत होता. “हा शेठ!” बेल्लारीकरने ओळख करून दिली. “तुश्रीनिवासका?” शेठ बोलला. एव्हड्या वेगाने शब्द उच्चारता येतात ह्या गोष्टीवर माझा विश्वास बसत नव्हता. शेठने उच्चारलेले ते पहिलेच वाक्य मला मुंबईमधल्या लोकलच्या गर्दीची किंवा कुंभमेळ्यातील गदारोळाची आठवण करून देऊन गेलं. “काय?” एकही पॉज न घेता उच्चारलेले ते वाक्य ऐकून माझी तारांबळ उडाली होती. “तू श्रीनिवास का?” शेठने ह्या खेपेला शब्दांपेक्षा त्यांच्या मधल्या अंतरावर जोर देत तेच वाक्य उच्चारले. “हो” किंचित सावरून मी म्हणालो. यापुढे मी शेठचे प्रत्येक वाक्य मी कान टवकारून ऐकू लागलो. मी जरा बोथट अगर गोड कानाचा आहे असा वाटून शेठने आवाजाचा वोल्युम तेव्हढा वाढवला पण वेग मात्र तोच. टेप रेकॉर्डर मध्ये जेंव्हा केसेट अडकते तेंव्हा आवाज जसा गोन्गाणा ऐकू येतो (ह्यापुढे माझी शब्दसंपदा जात नाही) तसा काहीसा शेठच्या बोलण्याचा धाट वाटला, अन मी खुदकन हसलो. शेठ क्षणभर चिडला पण त्याचे बोलणे ऐकून समोरच्या माणसाच्या चेहेर्यावर येणारे अगम्य भाव त्याला परिचयाचे असावेत म्हणून अखेर शांत झाला.

त्यानंतर शेठ आणि माझा संवाद-कम-चर्चासत्र-कम-सात्विक वाद (इथे वाद सात्विक पण असतो हे लिहिण्याचे कारण काही लोकांचा गैरसमज…) सुरु झाले. “तू नोन-व्हेज का खात नाहीस?” ह्या विषयावर शेठने मला पुण्याच्या ‘बर्गर किंग’ मध्ये नेताना अर्धा तास वाद घातला होता. आणि अखेर घरी लवकर जायचे असल्याने स्वत:च तो आवरता घेतला. “तू हिटलरला का मानतोस?” ह्या प्रश्नावर “यापुढे नाही मानणार ” असे उत्तर शेठ्ला चालत नाही. “यापुढे गांधींची उपासना करेन” ह्या उत्तरावर तर शेठ भडकून उठतो. आयुष्यात आपली मते ठाम असावीत, मग त्यासाठी कोणाशीही वाद घालण्याची आपली तयारी असावी असं शेठ मानतो. मागे एकदा “तू दाढीत चांगला दिसशील” अश्या एका (अर्थात प्रेक्षणीय बाजूकडील) मताचा पडताळा घेण्यासाठी शेठने इतकी दाढी वाढवली कि अखेर मुले (आणि ती प्रेक्षणीय बाजू देखील!) त्याला निखील शेठ ऐवजी निखील शेख म्हणू लागली.
पोलादपूरच्या दिलीपराव शेठ यांचे निखील हे थोरले अपत्य. अपत्य म्हटले कि त्याचा आपत्तीशी उच्चारी जवळीक असते. पण हे पोर मात्र कुटुंबासाठी इष्टापत्ती ठरले. घराची जबाबदारी अंगावर पडली तसे दिलीपरावांनी पुस्तके,नाटके, संगीत यातून अंग काढले. पण ह्या क्षेत्रातील रसिकपणाच्या बाबतीत शेठ वडिलांहून सुद्धा सवाई निघाला. ‘नु.म.वी’ मध्ये जायला लागल्यापासून शेठने अ, आ, ई सोबत रसिकतेचे धडे गिरवले. इतर मुले व रे वडाचा अगर वरवंट्याचा म्हणत आपल्या बुद्धीची धूळ जगभर उधळीत होती, तेंव्हा हे चिरंजीव व रे वसंतरावांचा असे म्हणत त्याच धुळीला आकार देत होते. आपल्या हेडमास्तर असणाऱ्या आजोबांकडे एकही पुस्तक नाही हि गोष्ट शेठ्ला प्रचंड छळे. शाळेत जाताना बस ऐवजी पायी जाऊन आपला पोकेटमनी वाचवून शेठने पुस्तके खरेदी केली.

मागे एकदा शेठला मी खांडेकरांचे ययाती मागण्यासाठी मागितले होते. त्यावर “घरी येऊन वाच, पण मी तुला पुस्तक होस्टेलवर देणार नाही” असे शेठने ठामपणे सांगितले. स्वकष्टार्जित गोष्टींविषयी असणारी उपजत आस्था ह्या स्पष्टपणामागे होती. ‘हे सारे मी मिळवलंय’ ह्याच्याऐवजी ‘हे सारे कष्टाने साध्य केलेय’ असा सार्थ आणि जाज्वल्य अभिमान त्यामागे होता. म्हणूनच शेठ साधासुधा ठरत नाही, जाज्वल्य ठरतो.
पण शेठचा हा जाज्वल्य अभिमान फक्त पुस्तके, संगीत ह्याबाबतीतच मर्यादित नाही. हिस्ट्री क्लबचा संस्थापक सदस्य असणाऱ्या ह्या पोराच्या घरालादेखील तितकाच रंजक इतिहास आहे आणि त्याचा शेठ्ला जाज्वल्य अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज सुरतेची लूट करण्यासाठी गुजरातेत गेले असताना परत येते वेळी त्यांनी आपल्यासोबत काही गुजराती व्यापारी आणून त्यांना कोकणात वसवले. शेठचे पूर्वज हे ह्या लोकांपैकीच होत. पुढे हे लोक पोलादपूरला स्थायिक झाले. ह्या पोलाद्पुरचा शेठ्ला प्रचंड अभिमान आहे. पोलादपूरचे बालाजी आवजी चिटणीस (सारा इतिहास ह्यांना बालाजी आवजी चिटणीस म्हणत असला तरी शेठ त्यांना बालाजी आवजी चित्रे असेच म्हणतो.) हे शिवाजी महाराजांचे चिटणीस होते. महाराजांचे पहिले चरित्रकार कवींद्र परमानंद नेवासकर यांनी पोलादपूरला समाधी घेतली. या दोन्ही आणि पोलादपूरला धूळ आपल्या पायी आणि मग माथी लावणाऱ्या प्रत्येकाचा शेठ्ला जाज्वल्य अभिमान आहे. किंबहुना जगातले सारे महात्मे पोलादपूरला पायधूळ झाडण्यासाठी पुन्ह:पुन्हा जन्म घेत असावेत असा आमचा होरा आहे. नु.म.वी.य असल्याने शेठ्ला महामहोपाध्याय (हि पदवी घेतली नवी तर शेठ पेटतो) दत्तो वामन पोद्दारांपासून स्वत:पर्यंत सार्या नु.म.वी.य जणांचा त्याला जाज्वल्य अभिमान आहे. पण शेठचा अभिमान अनाठायी नसतो. ख्यातनाम (कुख्यात म्हटले तरी चालेल) इतिहास संशोधक त्र्यंबक शंकर शेजवलकर हा शेठ, बेल्लारीकार आदि प्रभृतींचा मुकुटमणी. निनाद बेडेकरांनी (ते तेंव्हा शिवभूषण नव्हते) “शेजवलकरांना मोडी वाचता येत नव्हते” ह्या एका वाक्यात शेजवलकरांचा कडेलोट केला तेंव्हा शेठने हि गोष्ट मान्य केली होती.

स्वाक्षर्या जमावाने हा शेठचा आणखी एक छंद! व.पु. काळे ते अगदी अप्पा जळगावकर यांच्यापर्यंत शेठने अनेक मान्यवर लोकांच्या स्वाक्षर्या घेतल्या आहेत. शेठने अप्पा जळगावकरांची सही घेतली आणि अप्पांची देवाने भूतलावरून उचलबांगडी केली. असे अनेक दिग्गज शेठ्ला स्वाक्षरी देऊन पस्तावले. जणू काही सारे महात्मे शेठ्ला स्वाक्षरी देणे आणि प्रसिद्ध होणे ह्या दोनच कामांसाठी भूतली आले असावेत. आम्हाला त्रास देणाऱ्या एका मास्तरांची स्वाक्षरी घ्यायला शेठ्ला पाठवावे असा विचार होता पण तो यशस्वी झाला नाही.

वसंत सबनीस, वसंत देशपांडे आणि वसंत देसाई हे तीन वसंत म्हणजे शेठ्ची दैवते आहेत. सबनीसांची नाटके पाहताना हा पोर तालीन होऊन जातो, वसंतरावांनी ‘जमानाकीणारे मोर गाव’ म्हटल्याबरोबर त्या यामुनेकाठ्च्या वाळूत क्रीडा करून यायचे अद्भुत लेणे शेठ्ला लाभलेय. शेठ स्वत: संवादिनी उत्तम वाजवतो (ह्याला पुणे सोडून इतरत्र हार्मोनियम अगर बाजाची पेटी म्हणतात). नाट्यसंगीत संवादिनीवर वाजवून पाहणे हा शेठचा विरंगुळा आहे. माझ्या सलग तिसऱ्या प्रेमभंगाची करुण कथा (हि माझी एकमेव hat -trik) मी शेठ्ला सांगत असताना शेठ “या नवनवल नयनोत्सवा” असे म्हणत माझ्या तिसऱ्या प्रेमकथेच्या अंत्यविधीला सार्या जगाला बोलावीत होता.

शंभर नंबर हे मात्र शेठच्या आयुष्यातले एक न विसरता येण्याजोगे प्रकरण आहे. coep मुलींचे वसतिगृह (नावे दगा देऊ शकतात) मध्ये असणाऱ्या एका शेठच्या वर्गातील कन्यकेला ‘शेठ दररोज वासातीगृहाबाहेर येऊन उभा राहतो आणि तिच्या नावाने हाक मारतोय’ असा भास होई. तो आणखीही काही बोलत असावा असा तिचा दावा होता पण वेगात बोलण्याच्या शेठच्या सवयीमुळे तो काय बोलतो हे नीटसे काळात नव्हते. अखेर प्रकरण मिटले आणि भौतिक जगतातील शेठच्या एकमेव प्रेमप्रकरणावर पडदा पडला.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात उत्तम गुण मिळवून शेठ आता अमेरिकेत पुर्डू विद्यापीठात आहेत. अमेरिकेत जाण्यापूर्वी शेठ्ची हिस्ट्री क्लबने भारताची चिमुटभर माती देऊन शेठ्ची बोळवण केली. इंजिनियर झाला असला तरी शेठ अजून पक्का ‘शेठ’ आहे. आनंदाचे आणि मुख्य म्हणजे तो स्वत: लुटून इतरांना दाखवण्याच्या कलेचे कर्ज त्याने आम्हा सर्वाना दिलेय. ते सुद्धा बिनव्याजी!

ध चा मा!!!

नारायणराव पेशव्यांच्या खुनाच्या वेळी गारद्यांना दिलेल्या आज्ञापत्रात मुदलात “रावांस धरावे” असा उल्लेख होता. तो बदलून आनंदीबाईंनी “रावांस मारावे” असा केला आणि मराठी दौलतीचे धनी (आणि पुढे दौलत सुद्धा) आपल्या निम्म्या गोवऱ्या स्मशानी जाते पाहती जाहले. हा इतिहासाचा भाग एक सत्य-कथा आहे की प्रक्षिप्त(?) हा एक संशोधनाचा विषय आहे. पण या घपल्याहूनही आणखी एक विषय आहे जो की बऱ्याचदा हाताळला जात नाही आणि तो म्हणजे सांप्रत मराठी ऐतिहासिक साहित्यातून होणारे ध चे मा! अर्थात ऐतिहासिक कादंबरी लेखकांच्या ऐतिहासिक चुका!

मराठीत मुदलात ऐतिहासिक असे लिखाण होत नाही (इथे मराठी वाचक चवताळून उठण्याची शक्यता जास्त आहे. पण मी इथे न वाचल्या जाणाऱ्या थेसिस विषयी बोलत नसून समाजापर्यंत पोहोचणाऱ्या ऐतिहासिक लिखाणाचा अर्थात कादंबऱ्यांचा उहापोह करीत आहे.). कोणे एके काळी भारतीय अस्मिता जागविण्याच्या (मराठी) प्रयत्नांचा भाग म्हणून हरी नारायण आपटे, नाथ माधव प्रभृतींनी लिहिलेल्या कादंबऱ्या ह्या त्या बाबतीत आद्य होत. त्यानंतर ही धुरा रणजीत देसाई, शिवाजी सावंत ह्यांनी सांभाळली. सध्या विश्वास पाटील आदि मंडळी हा भर उचलीत आहेत. पण हा भार उचलताना त्या भाराचा ‘भारा’ कधी झाला ह्याचा पत्ता ह्यातील बऱ्याच लेखक मंडळीना लागला नाही असे खेदाने म्हणावे लागते.

सर्वात प्रथम हा विषय उपस्थित करण्याचे प्रयोजन. मुळात इतिहास हा क्लिष्ट पण पुराव्यांवर आधारित थेसिस मधून उकलला जात असला तरी तो समाज-मनापर्यंत पोहोचतो तो कादंबऱ्यांच्या माध्यमातून. साधी-सोपी आणि साहित्यिक चमत्कृतिनी भरलेली कादंबरी ही एखाद्या थेसिस पेक्षा केंव्हाही आकर्षक आणि मनोवेधक असतेच आणि म्हणूनच इतिहासाकडे पाहण्याचा, आपल्या मनातली इतिहासाबद्दलची उत्सुकता शमवण्याचा सामान्य माणसासाठीचा एक सोपा मार्ग देखील असते. पण इथेच सावधगिरीची गरज असते. कारण कादंबऱ्यांच्या माध्यमातून नकळतपणे लोकांच्या मतावर आणि त्यांच्या एकंदरीत विचारसरणीवर लेखकाच्या विचारसरणीचे संस्कार होण्याचा संभव असतो. ह्यातून जे काही साध्य होते ते म्हणजे इतिहासाचे मूळ स्वरूप बदलणे. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पानिपतचे तिसरे युद्ध. १७६१ साली पानिपत येथे मराठे आणि अब्दाली- जो की अफगाणीस्तानचा बादशहा होता- ह्यांच्यात तुमुल रणसंग्राम झाला. ह्यात अस्मानी आणि अब्दाली-पुरस्कृत संकटांनी हैराण मराठी फौजांची अफगाण फौजांनी धूळधाण उडवली. ह्यात मराठी फौजांनी जरी अतुलनीय पराक्रम गाजवला, तरी त्यांचा पराभव झाला. त्यांचा नेता सदाशिवरावभाऊ (उर्फं भाऊ) हा मरण पावला. तसेच मल्हारराव होळकर, शिंदे आदी वीर मराठे सरदार कसेबसे पळून आले. त्यानंतर ‘भाऊची बखर’ ह्या नावाने एक बखर प्रकाशित झाली. ह्यात होळकरादी लोकांचे ‘कर्तृत्व’ लपवण्यासाठी सदाशिवरावभाऊ हाच कसा पराभवास जबाबदार होता हे ठसविण्यात आले. ह्यामागे प्रस्तुत बखरीचा लेखक हा होळकर समर्थक अगर त्यांच्या दरबारीचा असावा असा प्रवाद आहे. कारण जरी ‘भाऊ हा एक कणखर सेनापती म्हणून पुढे न येता एक विचारी प्रशासक म्हणून दिसतो’ (पानिपत १७६१, लेखक त्र.शं. शेजवलकर. उद्गार जसेच्या तसे उद्घृत करता आले नाही ह्यासाठी दिलगीर.) असे जरी शेजवलकर आणि इतर बरेच इतिहासकार जरी म्हणत असले तरी ते भाऊवर कोसळलेल्या अडचणी ह्या ही तितक्याच मती कुंठीत करणाऱ्या होत्या हे अमान्य करीत नाहीत. भाऊचे कर्तृत्व ह्या अडचणीपुढे फिके ठरले, ही बाब बखरकार मांडीतच नाही. पुढे मात्र दुर्दैवाने बखरकाराचेच मत ग्राह्य धरले गेले आणि भाऊ -जो की पानिपतचा नायक होता (अगदी शत्रूच्या दृष्टीनेही)- तोच स्वकियांकडून आततायीपणाचे बिरूद मिळविता झाला. समाजमनावर होणारे साहित्याचे परिणाम सांगण्यासाठी पानिपतइतके बोलके उदाहरण दुसरे नाही. असे म्हणायचे कारण साधने असूनही, प्रत्यक्षदर्शी लोक उपलब्ध असून देखील त्यांचा अभ्यास न करता इतिहास (मग तो कोणेही कारणाने का असेना) चुकीच्या स्वरुपात, मोडतोड करून सांगितला गेला. आणि सांगायचे माध्यम लोकप्रिय असल्याने ह्या विचारांचे गारूड लवकरच समाजमनावर पसरले. समाज -मग तो कितीही सुशिक्षित का असेना- अश्या गोष्टींवर सहजी विश्वास ठेवतो. निव्वळ पानिपत हा एकच दाखला नव्हे.

विसाव्या शतकात साधारण ७० च्या दशकात एका माणसाला ‘कर्ण’ ह्या एका पात्राने झपाटले होते. हा माणूस कर्णावर लिहिण्याच्या ध्यासाने इतका झपाटला की त्याने कर्णाचे पाय जिथे जिथे लागले तिथे तिथे याने आपली पायधूळ झाडली.  अजरा गावी जन्मलेल्या ह्याच माणसाने साकारला एक अजरामर मराठी साहित्याविष्कार- “मृत्युंजय” आणि तो माणूस होता शिवाजी सावंत. एक कादंबरी म्हणून मृत्युंजय हा एक कोहिनूर आहे ह्यात शंका नाही. तत्वज्ञान, वातावरण-निर्मिती; मनाचे,त्यातील भावनांचे चित्रण, शब्दांची सूक्ष्म निवड ह्या साऱ्या गोष्टी “मृत्युंजय”ची वैशिष्ट्ये आहेत. पण असे असले तरी मृत्युंजय ही एका बाबतीत कमी पडते, आणि ते म्हणजे इतिहासाचे चित्रीकरण. माझ्या ह्या वक्तव्याला अनेकांचा आक्षेप असू शकतो आणि तो असा की मुळात ह्या कादंबरीमध्ये ही कर्णाची कादंबरी आहे ही गोष्ट स्पष्ट आहे. त्यामुळे जी काही वर्णने आहेत ती कर्णाच्या दृष्टीकोनातून आहेत. परंतु, माझा आक्षेप ह्या पुढचा आहे. कादंबरी कर्णाची आहे ही गोष्ट मान्य. अतएव, कर्णाने अलम दुनियेला शिव्या देणे ही गोष्ट सुद्धा मान्य. पण सावंतानी ज्या पद्धतीने ह्या एकंदरीत कादंबरीची मांडणी केली आहे – म्हणजे कुंती, कृष्ण, वृषाली, दुर्योधन ह्यांच्या मनोगतांच्या स्वरुपात- ती मांडणी कर्णाची लेखकाने कल्पिलेली बाजू आणि व्यासांनी मांडलेली बाजू ह्या दोन्ही बाजूंचा उहापोह करण्याचे सामर्थ्य लेखकाला देण्यास सक्षम आहे. पण असे असूनही कित्येक गोष्टी नजरेआड झालेल्या दिसतात. महाभारताच्या वेळी कर्णाने केलेला भीमाचा पराभव जितक्या ओळीत रंगविला आहे तितक्या शब्दात देखील पांडवांच्या दिग्विजयाच्या वेळी  भीमाने केलेला कर्णाचा पराभव लेखक मांडत नाहीत. व्यासांनी जे विजय धनुष्य (हे कर्णाच्या धनुष्याचे नाव होते.)भीमाच्या हाती महाभारत युद्धात ४५ वेळा तोडवून घेतले आहे ते लेखकाने अभंग ठेवले आहे. अतएव, भीमाला शिव्या देणे आणि कर्णाची (वस्तुस्थिती जाणून न घेता) स्तुती करणे अशी एक नवी फेशन त्या काळात रुजू झाली. वृकोदर – अर्थात ज्याचे पोट लांडग्यासारखे खपाटी गेले आहे असा (अर्थात सांप्रत भाषेत सिक्स पेक एब्सवाला) – भीम वक्रोदर- अर्थात ढेरपोट्या- म्हणून ओळखला जाऊ लागला. अर्थात हा काही फक्त सावंतांचा दोष नाही. महाभारताच्या ज्या काही शे-पाचशे (मला नक्की आकडा ठावकी नाही) स्थानिक आवृत्या देश-विदेशात निघाल्या त्यात भीम हा “खायला काळ, भुईला भार” अश्या सोडल्यास इतर स्वरुपात दिसत नाही. व्यासांनी रंगवलेल्या वृकोदर, सर्व-शस्त्र-पारंगत, आणि पांडवात सर्वात तर्कशुद्ध विचार करू शकणाऱ्या भीमावर तुंदिलतनु, गदाधारी, रासवट भीमाची छबी अशी काही चिटकली की ती सुधारणे अवघड आहे.

जी गोष्ट ‘मृत्युंजय’ ने भीमाच्या बाबतीत साध्य केली तीच गोष्ट ‘घाशीराम कोतवाल’ने नाना फडणवीस यांच्या बाबतीत करून दाखवली. नाना हे बाहेरख्याली (किंवा विश्वास नांगरे-पाटील यांनी आपल्या आई. ए. एस. इंटरव्हेऊ मध्ये सांगितले तसे- बिहाईन्ड वूमन) प्रतिमेचे होते. पण असे असूनही त्यांनी कधी बेअमली केली ह्याचा पुरावा नाही. प्रस्तुत नाटकावरून, नाना हा केवळ पुण्यातील स्त्रियांचा माग काढीत हिंडणे ह्या एकच कामाचा पगार पेशवे दप्तरातून घेत होता असा अनेकांनी समाज करून घेतला. वास्तविक ज्याच्या न झडणाऱ्या डंक्यांचे आवाज फिरंगी इंग्लंडात बसून ऐकत होते त्याच्या कर्तृत्वाचे इतर पैलू जगासमोर येण्याऐवजी हा एकच पैलू समोर आणला गेला. पुन्हा माध्यम देखील लोकप्रिय. अतएव साहित्याने इतिहासावर मात करणे जरूर होते

माझे हे एकंदरीत विवेचन वाचून लोकांची अशी खात्री झाली असेल की मी हे केवळ माझ्या वैयक्तिक आवडीनिवडीना धक्का लागला म्हणून आहे. परंतु माझा हेतू वेगळाच आहे. भारताच्या ज्या ज्या वेळी चुकीचे आदर्श समोर आणले गेले, आणि एकंदरीत इतिहासाची प्रतारणा झाली, त्या त्या वेळी देश संकटात सापडला. घोरीला सोडते वेळी पृथ्विराजाने युधिष्ठिराचा आदर्श बाळगला आणि नागवला गेला. ब्रिटिशांनी भारतात सत्ता स्थापन करतेवेळी आधी इथल्या लोकांचा बुद्धिभेद केला. त्यासाठी इथल्या इतिहासाचे विचीत्रीकरण करण्यात आले. ऐतिहासिक व्यक्ती, घटना ह्यांचा चुकीचा अन्वयार्थ लावण्यासाठी लोकांना प्रेरित केले गेले. आता देश जागतिकीकरणाच्या उंबरठ्यावर आहे, किंबहुना आपण माप ओलांडले आहे. जगाला एक खेडे म्हणताना आपण खेड्यात घरकुल उभारले आहे, धर्मशाळा नाही,अतएव ओळख जपणे ह्या खेरीज इतर पर्याय नाही ही गोष्ट ध्यानी, मनी, स्वप्नी असू द्यावी. आणि ह्यासाठी विचारांनी -मग ते आपल्या राष्ट्रीय वीरांचे समर्थक का असेना – इतिहासावर प्रभाव पडू ना देणे हे’च’ इष्ट आहे. कारण मूळ आणि शुद्ध स्वरूपातील इतिहास हाच भावी पिढ्यांना प्रेरक, मार्गदर्शक आणि उद्बोधक ठरतो.

अश्या अनेक चुका आहेत, त्यांचा समाचार पुन्हा केंव्हातरी !

इति लेखनसीमा

मर्यादेयं विराजते

श्रीनिवास

“ती”

होय ती ! उणीपुरी दोन वर्षेच लोटली आमच्या भेटीला ! पण आज मात्र माझे उभे आयुष्य व्यापूनही दशांगुळे उरलीय. मला तर जणू पहिल्याच भेटीत वेड लावले तिने! सुरुवातीला हा ही एक आकर्षणाचा प्रकार असेल असे म्हणून मी ही दुर्लक्ष्य करीत होतो पण हळूहळू हे त्याहूनही काही वेगळे आहे हे कळायला लागले.

तसे पाहायला गेले तर ती आणि मी बऱ्यापैकी सारखे आणि बऱ्यापैकी वेगळे सुद्धा! मी खूप जास्त विचार करणारा तशीच ती पण. पण ज्या वेळी मी नरम पडतो अगर भावनाविवश होतो त्या वेळी ती खंबीर असते, मला आधार देण्यासाठीच जणू! ती लिहिते सुंदर. बोलतेही खूप छान! अभ्यासात तर तिला कोणी मागे टाकेल असे वाटत नाही! म्हणून तर मी तिला अनेकदा “ब्यूटी विथ ब्रेन” म्हणतो. पण ती जितके छान बोलते त्यापेक्षा तिचे निरागस डोळेच पटकन बोलून जातात. तिच्या बऱ्याच गोष्टी स्पेशल आहेत, अगदी तिच्यासारख्या! डोळ्यांवर येणारी केसांची एखादी लडिवाळ बात नाजूक बोटांनी अलगदपणे कानामागे सरकवण्याची तिची ती अदा फक्त तीच जाणे. ओठांमागचे तिचे ते खट्याळ हसू जेंव्हा तिच्या तितक्याच छछोर डोळ्यातून पाझरते तेंव्हा सारे जग सुंदर वाटायला लागते. पण ह्या लपलेल्या हास्याहूनही  कितीतरी पटीने मोहक असते ते तिचे खळाळते हसू! एखाद्या पवित्र मंदिराच्या शांत गाभारयात टांगलेल्या घंटाना जेंव्हा अलगदपणे वारा छेडून जातो, आणि नुकत्याच जाग्या झालेल्या चिमणपाखरांसारखा त्या घंटांचा जो मंजुळ किलबिलाट सुरु होतो तो ही तिच्या त्या हास्याइतका मोहक नसावा. तिच्या त्या हसण्यातून हजारो चंद्राचे चांदणे एकाच वेळी लखलखत असते. तिच्या हास्याइतकीच सुंदर आहे ती तिची नजर. चालता चालता टाकलेला एक हलकासा कटाक्ष, कधी मी बोलत असताना तिचे ते एकटक पाहणे, उगीच चिडवल्यावर लटक्या रागाचा साज ल्यालेला तो दृष्टीक्षेप … कुबेराने वाटेत जाताना अनंत रत्नांची उधळण करावी, प्रत्येक रत्न इतराहून वेगळे तरी तितकेच मनोवेधक असावे आणि एखाद्याने त्या रत्नांना वेचत सुटावे तसा मी तिच्या डोळ्यांचे हे अविष्कार टिपत जातो. तिचा एखादा तिरपा कटाक्ष मनाला विद्ध करून जातो तर कधी आमची झालेली नजरानजर लेक्चरला पहिल्या बाकावर असलो तरी तिचे स्मरण देत जाते.

तिच्यासोबत घालवलेले क्षण हा तर माझ्यासाठी एक अनमोल ठेवा आहे. खरे सांगायचे तर, भेटलो तरी आम्ही फारसे बोलतच नाही. ह्या बाबतीत माझी अवस्था फार विचित्र होते. तिचे मेसेज- जे स्वतःहून क्वचितच येतात- आले कि मला तिच्याशी फोनवर का होईना बोलावेसे वाटते. कारण तिच्या आवाजात तिचे विचार ऐकणे हि एक पर्वणी असते. फोनवर बोलत असताना देखील ती काय बोलतेय ह्याकडे माझे जास्त लक्ष्य नसतेच. मी तिच्याशी बोलतोय ह्या आनंदातच मी न्हात असतो. फोनवर बोलताना तिचे ते हसणे ऐकले कि, हे सारे बोलणे होत असताना ही समोर असती तर किती बरे झाले असते असे वाटून जाते. कधीकधी आम्ही कर्म-धर्म-संयोगाने भेटतो सुद्धा! पण अनेकदा आमचे भेटणे हे ती, मी आणि इतर अशी भेट होऊन बसते. अशा वेळी ह्या ‘इतरां’चा -मग ते कितीही जवळचे का असेना -राग येतो. पण हा राग तिच्याकडे पाहताना तितक्याच चटकन मावळून पण जातो. जर का आम्ही दोघे भेटलो तर मात्र माझी अवस्था शोचनीय होऊन बसते. कारण तिच्या समोर गेल्यावर सारे शब्द, सारे मुद्राभिनय, सारे विनोद, सारी गप्पाष्टके रंगवण्याची कौशल्ये हात गळून, आणि शस्त्रे टाकून बाजूला होतात. काय बोलावे ते काळातच नाही. तिच्याकडे एकटक पहायची सोय नसते. मग मी कुठेतरी दूर डोळे लावून बसतो. डोळ्यांसमोर मात्र तीच असते. काहीतरी उगाच बोलायचे म्हणून मी बोलतो. “आजचा दिवस खूप भारी गेला आणि आता तू भेटलीस” हे किंवा “आजचा दिवस फार फार बोर गेला, बरे झाले भेटलीस” असे अनेक विचार मनात थैमान घालीत असतात. पण ते विचार, त्या भावना व्यक्त करायला वाव नसतो. तिच्यासमोर हे काहीच बोलता येत नाही मला. ती चिडेल, आणि मग आता जे भेटतीये, जे बोलतीये ते सुद्धा पुढे जमणार नाही अशी उगाच धास्ती वाटत राहते. थोड्या वेळाने आम्ही वेगळे होतो. पण मी मात्र ते क्षण पकडून तिथेच उभा असतो. शरीराने कुठेही गेलो तरी मनाने मात्र तिथेच असतो. त्या भेटीच्या ठिकाणी! कधीकधी मी वेगवेगळ्या चिंतांच्या ओझ्याखाली वाकून गेलेला असतो. आभाळ काळ्याकुट्ट मेघांनी आच्छादले जावे, काहीच दिसू नये तसे काहीसे संताप, भीती, शंका मनावर पसरतात. शरीर, मन यांना अभूतपूर्व मरगळ आलेली असते. अशा वेळी तिच्या भेटीच्या ओढीने मन अजूनच अस्वस्थ होते. अश्या वेळी तर तिची भेट अजूनच दुर्मिळ होऊन बसते. उभ्या जगाने आपल्याशी असहकार पुकारलेला असतो. मेसेज जात नसतात, होस्टेलवरचे इंटरनेट हे डिसकनेक्ट होण्यासाठीच कनेक्ट केले जाते ह्याची सतत प्रचीती येत राहते. या आगीत मनाच्या नंदनवनाचे जळून कोळसे होतात अन मग कधीतरी ती येते. आणि चांदण्यांच्या शिडकावा करीत सारी जुनी जळमटे धुवून काढते. तिच्या साक्षीने नंदनवन पुन्हा बहरू लागते. तिच्या गालांवर पडणाऱ्या त्या धुंद खळ्यामध्ये मी माझ्या साऱ्या चिंता, दु:खें विसरतो.

मला आज येणाऱ्या कित्येक गोष्टी तिच्यामुळे येतात, किंबहुना तिच्यासाठीच मी करतो. माझ्या प्रत्येक फसलेल्या, अगर यशस्वी विनोदाची एकमेव प्रेक्षक ती असते. सारे जग जरी माझ्या विनोदाला हसले आणि ती मात्र हसली नाही तरी तो विनोद फुकट गेला असे वाटत राहते. दिवस कितीही वाईट गेलेला असला, तरी माझ्या विनोदाने मिळवलेले तिचे एक हसू साऱ्या वाईट आठवणी पुसून काढते. जी गोष्ट विनोद सांगायची तीच विनोद लिहायची. मला विनोदी लिहिता येते हा साक्षात्कार तिला झाला, आणि तिच्यासाठीच मी ती लिहिले. आजसुद्धा तिला वाचायची इच्छा झालीये म्हणून मी हे सारे लिहितोय.

जिथेजिथे जातो; तिथेतिथे ती, तिचे विचार, तिच्यासोबत घालवलेल्या त्या मोजक्याच पण चिरंतन क्षणांच्या आठवणी सतत माझ्यासोबत असतात. सावली तरी अंधारात आपली पाठ सोडते पण ह्या आठवली… अंधाऱ्या, एकाकी रात्री जागवताना मला ह्यांचाच आधार असतो. कधी कुठले गाणे ऐकताना मती काही क्षण पुरती गुंग होऊन जाते. विरहगीतातले दु:ख, वीरगीतातले प्रोत्साहन, भावगीतातले भाव मनाचा ठाव घेतात. अशा वेळी कुण्या एका अनवट रागाची, गाणार्याने घेतलेल्या एखाद्या मुरक्याची आठवण मनाला “हाय ” म्हणायला लावून जाते. शरीर फक्त “वाह” म्हणण्याइतपतच शुद्धीत असते. असा एखादा मुरका, गाण्यातली एखादी ओळ काळीज कापून नेऊ पाहते. पण काळीज आहे तिथेच राहते… कारण पुढल्याच क्षणी तिचे मंजूळ हसू मनाच्या सांदीकोपर्यात निनादू लागते. काहीही सुंदर दिसले की तिची आठवण मनाला छळू लागते. एखादी सुंदर कविता अगर एखादे पुस्तक वाचताना ती पानापानातून, शब्दाशब्दातून डोकावत राहते. रायगडावर सूर्यास्त पाहताना, अजिंठ्याच्या लेण्यातले चिरतरुण रंग न्याहाळताना तिची प्रतिमा समोर येते; अन मग मन नकळत ती आणि समोरचे दृश्य यात अधिक सुंदर काय ह्याची तुलना करू लागते, आणि अचानक खांद्यावर पडलेली एखादी थाप त्या धुंद विचारांतून मला बाहेर ओढते. एखादा टपोरा गुलाब मला तिच्या लाजेने चूर झालेल्या गालांची आठवण करून देतो. कधी वसंतात कूजन करणारा कोकीळ उगचः तिच्या आवाजाच्या माधुर्याशी स्पर्धा करतोय असे वाटते आणि मला त्याच्या त्या धाडसाचे हसू येते. समोरचे सारे सौंदर्य मला आनंद देण्याऐवजी ती नसल्याचा शोक करायला लावते. पौर्णिमेचा चंद्र मला तिची आठवण करून देतो. क्षितीजापाशीचा त्याचा तो रक्तिम चेहेरा मला उगाच लटका राग धरून बसलेल्या तिची आठवण करून देतो. चंद्र मध्यावर आल्यावर जसे त्याच्यापासून काही लपत नाही तसे मला तिच्या समोर काही लपवता येत नाही. ती जाताना मनात अनंत विरहीणींचे सूर दाटून येतात. आणि ती गेल्यावर मी चंद्र नसलेल्या आभाळासारखा  होतो. सभोवती अनंत चांदण्या असूनही एकटा….

-  श्रीनिवास याडकीकर (तृतीय वर्ष, विद्युत अभियांत्रिकी, सी ओ ई पी)

Follow

Get every new post delivered to your Inbox.