दिसामाजी काहीतरी

प्रवर्ग: बेल्लारीकर

आर्य आणि अनार्य : एक धावता (अगदी f -1) आढावा .

इतिहास म्हणजे या ना त्या कारणाने वेळोवेळी फुटणाऱ्या बॉम्बगोळ्यांनी व्यापलेले कुरुक्षेत्रच  जणू. अलीकडे तर कधी कोणत्या मुद्द्यावरून वाद , वितंडवाद आणि दहशतवाद फोफावतील, हे सांगणे कठीणच आहे. मग काल कोणताही असो , प्रदेश कोणताही असो. युरोपात पाहिले तर लोक  चेंगीज खान , अरब यांच्या नावाने बोटे मोडतात , ज्यू हिटलरला शिव्या घालतात. आफ्रिका आणि वसाहतवादाच्या जोखडातून नुकतेच मुक्त झालेले कोणतेही देश युरोपच्या नावाने खडे फोडतात .  भारतात तर असे बॉम्बगोळे  किती आहेत कुणास ठाऊक. पण या सर्व स्फोटकांचा बाप म्हणजे सो-कॉल्ड आर्यन इन्व्हेजन थेअरी . या सिद्धांतावरून जितका कंठशोष झाला, तितका अजून कोणत्याही मुद्द्यावरून झाला नाही . तस्मात या आणि अजून काही लेखांमधून याचा एक अति-अति धावता आढावा घेण्याचा प्रयत्न आहे .

हा सिद्धांत पुढे करून १९व्य शतकात ब्रिटीश लोकांनी आपल्या साम्राज्यवादाला नैतिक बैठक देण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुल्यांनी हा सिद्धांत वापरून आर्य हे बाहेरचे उपरे असून त्यांनी आधीच्या अधिक प्रगत अशा मूलनिवासी  द्रविड लोकांना पराभूत केले , असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला . बहुजनसमाजाला पारंपारिक हिंदू धर्मापेक्षा एक वेगळी ओळख देण्याचा हा प्रयत्न होता. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी   या सिद्धांताचा उहापोह “who were the shudras?”  या पुस्तकात केला आणि फुल्यान्प्रमानेच  मत दिले. तामिळनाडूमध्ये हा सिद्धांत वापरून सो-कॉल्ड द्रविडपणाला चेतविण्याचा प्रयत्न केला गेला. आजदेखील काही तथाकथित आणि पोकळ बहुजनसमाजवादी लिखाणात या सिद्धांताची मढी उकरून हवी तशी सजविली जातात.अर्थात आर्यन इन्व्हेजन थेअरी हा आर्य संकल्पनेचा एक भाग आहे. ती संकल्पना वापरून हिटलरने जो दंगा केला, तो महशूर आहे . “white man’s burden” हादेखील असाच एक रद्दी सिद्धांत आहे. पण त्याबद्दल नंतर कधीतरी .

मुळात हा सिद्धांत काय आहे? हा सिद्धांत असे सांगतो , की सुमारे १५०० इ.स .पू. या वेळी भारतात आर्य नामक लोक बाहेरून आले, त्यावेळी भारतात असलेल्या द्रविडीय लोकांना त्यांनी हळूहळू आपले गुलाम बनवले, आणि आपला वरचष्मा भारतावर प्रस्थापित केला . आर्य लोकांचा वंश द्रविड लोकांपेक्षा वेगळा होता , त्यांची भाषा देखील वेगळी होती .

तर हा सिद्धांत कोणी सर्वात आधी मांडला? याचे उत्तर देण्या आधी मुळात या सिद्धांतामागील पार्श्वभूमी थोडीशी समजावून घेऊ. १८व्य शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटीशांची भारतावरील पकड बर्यापैकी मजबूत होऊ लागली आणि बरेच युरोपियन्स भारतात येऊन भारतीय संस्कृतीचा अभ्यास करू लागले . त्याची परिणती म्हणजे “indology” ही शाखा होय. सर विलियम जोन्स हे त्यातील एक अग्रगण्य नाव आहे . संस्कृत चा अभ्यास करून त्यांनी आधीच्या लोकांनी केलेल्या तर्काला पुष्टी दिली, की संस्कृत, ग्रीक आणि लातिन या ३ भाषांची पूर्वज भाषा ही एकच होती. त्यामुळे भारत आणि युरोप यांचे सांस्कृतिक आजेपणजे एकच असावेत असा निष्कर्ष त्यांनी काढला. त्याचीच परिणती म्हणजे वरती सांगितलेला हा सिद्धांत होय . max  मुल्लर , जॉन मुइर आणि इतर अभ्यासकांनी हा सिद्धांत पहिल्यांदा मांडला.

आता या सिद्धांतातील तथ्य आणि मिथ्य दोन्ही तपासून पाहू . विलियम जोन्स हा संस्कृत भाषेचा पहिला प्रसिद्ध अभ्यासक संस्कृत बद्दल असे म्हणतो , की संस्कृत ही ग्रीक आणि लातिन यापेक्षा बाहेरून वेगळी असली तरी त्यांचे व्याकरण आणि साधारण ढाचा बर्यापैकी सारखा आहे आणि हा सारखेपणा इतका आहे , की या तीनही भाषांची मूळ भाषा १ च असावी . त्या भाषेला तो “proto-indo-european” असे म्हणतो. इतकेच नाही , तर पारशी लोकांच्या अवेस्ता नामक धर्मग्रंथातील पर्शियन भाषा आर्ष संस्कृतशी खूपच मिळतीजुळती आहे. हे झाले भाषिक पुरावे . कधीकाळी आर्य लोक हे भारताबाहेर होते याला काय पुरावा? इराणमधील प्राचीन  संस्कृती ही आर्य संस्कृतीशी मिळतीजुळती होती, पण त्यापुढे काय? पण तुर्की मध्ये बोगोझ-कोई नामक ठिकाणी मितान्नी   साम्राज्यामधील तुशारात्त राजाने इजिप्त च्या अमेनहोतेप तिसरा या राजाबरोबर केलेला  शांतता करार मिळाला क्युनिफोर्म लिपीत लिहिलेला मिळाला आहे . त्यात अग्नी, वरुण यांसारख्या स्पष्टपणे आर्यन / वैदिक देवतांना साक्षी मानले आहे . या कराराचा काळ आहे इ.स.पू . १४००   . ह्यावरून असे सिद्ध होते की भारताबाहेर देखील आर्य संस्कृती प्राचीन काळी पसरलेली होती.

पण मग द्रविड लोकांवरील त्या तथाकथित हल्ल्याचे काय? आर्य हे हल्लेखोर होते , असे म्हणणार्यांच्या मताला पुष्टी देणारा एकच अप्रत्यक्ष पुरावा आहे, तो म्हणजे पाकिस्तान मधील बलुचिस्तान भागात आजही सुमारे २२ लाख लोक बोलत असलेली ब्राहुई ही भाषा होय. जरी शब्दसंपदा अलीकडच्या काळात उर्दू फारसीने प्रभावित असली तरी व्याकरण इत्यादी प्रकारे तपासू गेलो तर ती एक द्रविड भाषा आहे , असे सर्व भाषातज्ञ म्हणतात. बाकी सर्व द्रविड भाषा दक्षिण भारतात आणि हीच एकटी उत्तरेत कशी काय? नक्की उत्तर कुणालाच माहित नाही. पण यावरून स्थलांतर हे एकच तर्कशुद्ध उत्तर निघते.

आता हा पुरावा असे सूचित करतो, की भाषेचे कदाचित स्थलांतर झाले असावे. पण मग तथाकथित आर्य वंशाचे काय? तर २००५ साली National DNA analysis centre, Kolkata , Oxford university zoology dept. ani Estonian biocentre या संस्थांमधील संशोधकांनी भारतामधील ३२ भटक्या जमाती आणि ४५ (नेहमीच्या) जाती यांमधून हजारो लोकांचे डी एन ए तपासले आणि निष्कर्ष काढला की सुमारे गेल्या ४०००० वर्षात तरी उत्तरपश्चिम भागातून मोठ्या प्रमाणावर लोकांचे कोणतेही उल्लेखनीय  स्थलांतर झालेले नाही . कुणाला हवे असल्यास त्याची पीडीएफ माझ्याकडे आहे. त्यामुळे वंशाचा मुद्दा तरी निकालात निघाला .

भारतीय संस्कृतीचा सध्या ज्ञात असलेला सर्वात जुना अवशेष जी हडप्पा संस्कृती, ती आर्य  की द्राविडी? हडप्पा संस्कृती ही आर्य नाही , असे म्हणणार्यांचा भर कायम घोडे आणि त्याशी निगडीत असलेल्या रथ आणि इतर गोष्टींशी असतो. त्यामुळे घोड्यांचा  उल्लेख असणे म्हणजेच आर्यपणाचे लक्षण आहे का? आता “आर्य /वैदिक” संस्कृतीशी निगडीत असलेला सर्वात जुना ग्रंथ जो ऋग्वेद , तो याबद्दल काय सांगतो? त्यात घोड्याचे उल्लेख आहेत , परंतु निव्वळ घोडाच नाही , तर बैल , गायी यांनादेखील महत्वाचे स्थान आहे. आता एक fact म्हणजे घोडा हा प्राणी मुळात भारतातील नाहीच. इ स पू २००० पूर्वी अश्वपालनाचे उदाहरण दक्षिण आशिया मध्ये सापडलेले नाही. तर एक गोष्ट नक्की , की घोडा हा प्राणी बाहेरचा आहे. पण मग हडप्पाचे  काय? निव्वळ  घोडा नसणे हे  द्रविडपणाचे लक्षण कशावरून?  ज्या अर्थी ऋग्वेद आणि जुन्यातील जुनी उपनिषदे सरमा-पणी यांसारख्या कथा रंगवून सांगतात आणि त्या कथा गाईंच्या  चोरीबद्दल आहेत , त्या अर्थी ती आर्य संस्कृतीची अतिशय जुनी अवस्था आहे , आणि हडप्पादेखील तसे असण्याची शक्यता आहे. अर्थात हे सगळे अवलंबून आहे ते हडप्पाच्या चित्रलिपीच्या सर्वमान्य अशा वाचनावर . तोपर्यंत आर्य आणि द्रविड या दोन्हीही पक्षांना मूग गिळून बसणे भाग आहे.

तर सारांश असा , की घोडा भारतात बाहेरून आला आणि काही प्रमाणात भाषिक स्थलांतर झाले .पण मग संस्कृत भाषा ही मूळ भारतातील आहे की नाही? द्राविडी भाषांचे भारतीयत्व निर्विवाद आहे, तर खरी “भारतीय भाषा ” कोणती?   S R Rao  या संशोधकांनी संस्कृतवर आधारलेले त्यांचे वाचन मांडले १९९२ साली , पण ते मान्यताप्राप्त नाहीये . जोपर्यंत हडप्पा बोलत नाही, तोपर्यंत आर्य आणि द्रविड ह्या दोन्हीही पक्षांना आपापला प्राचीनतेचा दावा पुढे रेटता येणार नाही.

इत्यलम!

- निखिल बेल्लारीकर (कोलकाता)

ग्वाल्हेर ग्रौंडभूवनी

विक्रमांचा महामेरू | बहुत रनांसी आधारू |

अखंड खेळाचा निर्धारु | श्रीमंत सचिन ||१||
सचिनचे कैसे चालणे | सचिनचे कैसे खेळणे ||
सचिनचे प्रेरणा देणे | कैसी असे ||२||
रनपती तो जगती | करा किती उचापती |
डाळ न शिजे पुरती | कोणाचीही ||३||
सचिनचे आठवावे शॉट | पहावा BATTING चा थाट |
पळे BALL पटापट |  ग्राउंड बाहेरी ||४||
स्वप्नी जे देखिले रात्री | ते ते तैसेची होतसे |
बदले CHANNEL मी जैसे | येथ आलो पहा कसा ||५||
सामना चालीला कैसा | शॉट अखंड चालती |
खेळला देव देवांचा | ग्वाल्हेर ग्रौंडभूवनी||६||
आनेक  BALL ते येती | मात्रा पै नच चालली |
सचिन कर्ता सचिन भोक्ता | ग्वाल्हेर ग्रौंडभूवनी||७||
बुडाली आफ्रिका पापी(?!) | चेंडू संहार जाहला |
उदंड जाहल्या धावा |  रमा रेकॉर्डसंगमे||८||
योर्करू तो जरी आला | सीमा ती पार  केलीसे\
कळेना काय रे होते |  ग्वाल्हेर ग्रौंडभूवनी||९||
चौके चौके किती छक्के | गणना करवे नच |
ऑफ  ऑन चहूलोकी | चेंडू तो भिरकाविला ||१०||
येकला लढला योद्धा | अन्ये गम्मत पाहती|
रनांचा डोंगरु झाला | ग्वाल्हेर ग्रौंडभूवनी||११||
हे धरा अकरा श्लोकी | लाभली शोभली बरी|
दृढ bat निसंदेहो | सचिन तो सर्व काळीचा ||
.                                                    – निखिल बेल्लारीकर

वृत्ते – कवितेला जखडणारी की बांधणारी..?

शाळेत असतानाची सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे मराठीच्या पुस्तकातल्या कविता….आणि सगळ्यात नावडती गोष्ट म्हणजे त्या कवितांचे व्याकरण…वृत्ते. कवितांना चाली लावून म्हणायला मजा यायची पण त्याच चालींमागचा आधारस्तंभ असलेली वृत्ते नकोशी वाटायची…सगळे गण पाठ करून वर कोणते वृत्त आहे ते शोधा म्हणजे कटकटच होती….त्याच वृत्तांविषयी नंतर नंतर आत्मीयता वाटायला लागली. कवितेची चाल ही कवितेचा अर्थ पाहून ठरवावी लागते. तेच रसपरीपोषाला साजेसे असते. नाहीतरी गम्मत होते. ‘झाले युवतिमना दारूणरण’ सारखे प्रेमगीत संग्रामगीत वाटायला वेळ लागत नाही….आणि चाल कुठून येते? चालीचा आणि वृत्तांचा फार जवळचा अनुबंध आहे. त्यामुळे कवितेचा रस पाहून त्यानुसार वृत्त निवडले जाते. भुजंगप्रयात म्हटले की काय रचना असावी, ओवीतून कोणते विषय हाताळले जावेत, नि जीवनलहरी वृत्त असल्यास काय भावना कवितेतून असाव्यात याची वाचक त्यामुळे एक अपेक्षा घेऊन असतो. (आदरणीय नानिवडेकरांस – यास अपवाद आहे हे मान्य आहे. लगेच ‘हल्ला-बोल’ करू नका) तर यावर ही लेखमाला. पहिल्या भागात मराठी/संस्कृत/हिंदी वृत्तांचा धावता आढावा घेतला जाईल. दुसऱ्या व तिसऱ्या भागात अनुक्रमे पाश्चात्य आणि पर्शिअन वृत्तांविषयी लिखाण असेल.

वृत्ते हा काव्यातला (मुक्तछंदाचे आगमन होण्याआधी पर्यंत तरी आणि काही अंशी अजूनही) एक महत्वाचा भाग आहे. संस्कृत टीकाकार विश्वनाथ म्हणतो- “वाक्यं रसात्मकं काव्यं | ” या व्याख्येत सर्वोपरी महत्वाचा भाग म्हणजे रस आहे, आणि त्या रसाची अभिव्यक्ती सुकर व्हावी, म्हणून इसवी सनपूर्व २०० पासून पिंगलछंद:शास्त्र संहितेपासून ते  कुसुमाग्रजापर्यंत अनेकांनी नवीन वृत्ते रचली, असलेली संकलित केली आणि गेयतेने परिप्लुत अशी रसाभिव्यक्ती सदर केली. आणि विशिष्ट रस व्यक्त करण्यात यांनी इतकी महत्वाची भूमिका बजावली आहे, की त्यांना नजरेआड करता येत नाही. मग ज्ञानेश्वर, एकनाथ, मुक्तेश्वर यांची सहज सुंदर ओवी असो, नामदेव-तुकाराम-रामदास यांचे अभंग असोत, वामनपंडितांचा सुश्लोक असो अथवा आर्या मोरोपंतांची असो. पसायदानामधील “जे खळांची व्यंकटी सांडो | त्या सत्कर्मी रती वाढो|” हे उदात्त मागणे लीनपणे मागणारी शालीन ओवीच त्या ठिकाणी सुंदर वाटते, तर हिंदवी स्वराज्याचा जोरकस साक्षात्कार “स्वप्नी जे देखिले रात्री|ते ते तैसेची होतसे |” असा कथन करताना रामदासांच्या अनगड शैलीला अनुष्टुप वृत्तच मानवते. गजेंद्र मोक्षात गजेन्द्राने केलेला धावा “नसे ठाव ब्रह्मा, न शिव अथवा श्रीपती हरी | हरी जो तापाते उचलुनी कृपासिंधु लहरी|” शिखरिणी वृत्तात वाचताना मूर्तिमंत कारुण्य डोळ्यांसमोर उभे ठाकते. (इथे मी फक्त मराठी कवितेतील उदाहरणे घेतली आहेत. प्रसंगवशात पुढे संस्कृत, हिंदी, याही भाषांमधील कवितांचे दाखले येतीलच.)

वृत्तातील रचनेवर एक आक्षेप नेहमी घेतला जातो , की वृत्तांच्या गणमात्रादि बंधनांमुळे कवी कारण नसताना जखडला जातो. यात तथ्य नक्कीच आहे, परंतु वृत्तांची बंधने मान्य करूनहि जुन्या कवींनी जी रचना केली आहे, ती पाहिली म्हणजे मन स्तिमित होते. या आक्षेपाचा शांता शेळके यांनी “नवनीत” च्या प्रस्तावनेत चांगलाच समाचार घेतला आहे. बदलत्या काळानुरुप बदलायला हवे हे मान्य, परंतु जुन्या संकेतांमध्ये चांगले असे खूप आहे. आता अक्षरगणवृत्तापेक्षा मात्रावृत्ते कधीही जास्त फ्लेक्सिबल असतात, आणि त्यामुळे आनंदराव टेकाडे यांनी आनंदकंद नामक वृत्त स्वत: तयार केले, कुसुमाग्रजांनी जीवनलहरी वृत्त तयार केले. आशयाची सोय पाहून वृत्ते रचली तर कवीला “रेंज” खूप मोठी मिळते. वृत्त हा मूळ म्हणजे सांगाडा आहे, त्यात कोणता रस ओतला तर काव्य जिवंत होईल , हि मेख कळली , की “समसमा संयोग की जाहला !”

वृत्तांचे अतिशय ढोबळ मानाने २ प्रकार आहेत- १) अक्षरगणवृत्त आणि २) मात्रावृत्त. अक्षरगणवृत्तामध्ये उपप्रकार म्हणजे १) समवृत्त २) अर्धसमवृत्त आणि ३) विषमवृत्त. यामध्ये ४ ओळींची गण रचना सारखी असते, २ ओळींची सारखी असते अथवा सर्वच ओळींची वेगळी असते. आता खाडीलकरांच्या भाषेत सांगायचे झाले तर “झाले इतके वृत्त स्तवन  पुरे आहे”.

आता संस्कृत साहित्यातील काही प्रसिद्ध उदाहरणे पाहू. अर्थातच पहिले उदाहरण हे कवीकुलगुरू कालिदासांच्या मेघदुतातील आहे. मेघदूताचे कथानक हे “विप्रलंभ शृंगार” या  प्रकारात मोडणारे आहे. त्यात आपली पत्नी बरोबर नसल्याने यक्ष शोक करतो आहे. यासाठी कालिदासाने वापरलेले वृत्त आहे “मंदाक्रांता “. नाव सुद्धा कसे चपखल आहे- मंद + अक्रांता. ती व्यथा ” मेघालोके भवती सुखिनोsप्यन्यथावृत्तीचेत: |  कंठाश्लेषप्रणयिनीजने किम पुनर्दूरसंस्थे | ” अशा श्लोकामधून प्रभावीपणे व्यक्त होते. शांत शेळकेंनीच केलेल्या मेघदूताच्या मराठी अनुवादामध्ये ‘पादाकुलका’ वृत्त वापरले आहे. (इच्छुकांकरता – मेघदूताचा अजून एक रसाळ अनुवाद चिंतामणराव देशमुखांनीही केला आहे, जरूर वाचवा)

गीतेसारख्या काव्यात तर ” वाचमर्थोsनुधावती” चा प्रत्यय येतो. गंगालहरीमध्ये गंगेची महती वर्णन करताना शिखरिणी मधून जगन्नाथ पंडित “समृद्धं सौभाग्यं सकलवसुधाया: किमपि तत” असे म्हणून जातात, तर गीतगोविन्दामध्ये कृष्णाचा खट्याळपणा वर्णिताना जयदेव आर्येत म्हणून जातो – ” धीर समीरे यमुना तीरे वसती वने वनमाली  | गोपी पीनपयोधरमर्दन चंचलकरयुगशाली |”. (इथे “अवजड आणि सुटसुटीत आर्या ” हा पु लंचा जोक आठवल्याशिवाय राहत नाही. जिज्ञासूनी गाळीव इतिहास प्लीज मुळातून वाचावा! तो खरा मुक्त-छंद)

संस्कृत आणि मराठी नंतर नंबर लागतो हिंदीचा. भक्तीकाल आणि रीतीकालामध्ये अतिशय सुंदर प्रासादिक रचना झाल्या. त्यात कबीर, मीराबाई पासून ते केशवदासापर्यंत सगळे येतात. मात्र अमीर खुसरोला विसरून चालत नाही. भारतीय आणि इस्लामी संस्कृतीचा सांस्कृतिक मेळ घडवून आणण्यात या माणसाचे फार मोठे कर्तृत्व आहे. पण या सगळ्या गोड गोड स्वप्नांतून झडझडून जागे झाल्यासारखे केले ते भूषणाने. सवाई, मनहरण या वृत्तान्मधून त्याने शिवाजी महाराजांवर अशी काही कविता केली आहे की भाई वाह ! . मनहरणलाच मराठीत घनाक्षरी असेही म्हणतात. त्याची बरीच रचना या वृत्तात आहे. एक प्रसिद्ध उदाहरण देतो-

इंद्र जिमी जंभ पर| बाडव सुअम्भ पर |
रावण सदंभ पर| रघुकुलराज है||
पौन बारीबाह्पर| संभू रतिनाह पर|
ज्यो  सहस्बाह्पार| राम द्विजराज है ||
दावा द्रुमदंडपर | चीता मृगझुंडपर|
भूषण वितुंडपर| जैसे मृगराज है||
तेज तम अंस पर | कान्ह जिमी कंस पर|
त्यो मलीच्छ वन्स पर| सर शिवराज है ||
वृत्ते हा फक्त भारतीय काव्याचा विशेष आहे का? अजिबात नाही. अरेबिक काव्यात मिस्रअ प्रचलित आहे. मिस्रअ म्हणजे अर्धी ओळ. उर्दूमध्ये गझलेचे पण रचना करताना काफिया-रदीफ सारखे काही नियम असतात, किंवा अनेक इतर काव्यप्रकार आहेत जसे की मसनवी, कसिदा वगैरे. फार्सीमध्ये ही अनेक वृत्ते आहेत. तसेच ग्रीक आणि लातिन काव्यात दाक्टीलिक हेक्सामीतर, Sonet  इत्यादी वृत्ते प्रचलित आहेत. त्यांचा आढावा पुढे केव्हातरी घेऊ.
.                                                                                                                      – निखिल बेल्लारीकर

धन्य ती यावनी कथा (2)

भारतात  जे स्थान रामायण आणि महाभारताला आहे, तेच स्थान युरोपमध्ये ट्रॉयच्या युद्धाला आहे. हे साम्य इतके आहे, की मेगास्थेनीस हा अलेक्झांडरचा भारतातील राजदूत हा बिनदिक्कत म्हणून जातो, की भारतातील लोकांना इलीयड माहित आहे. महाभारताचा उल्लेख तो १,००,००० कडव्यांचे इलीयड असा करतो. आणि अतिशयोक्तीचा दोष नजरेआड केला तरी पात्रांच्या बाबतीत साम्य नक्कीच आहे.

पहिले साम्य म्हणजे धृतराष्ट्र आणि प्रीआम  या दोघानाही खूप मुले होती – धृतराष्ट्राला १०१ तर प्रिआमला ८७. दोघेही आपल्या पुत्राचे मरण स्वत: पाहतात, आणि अनुक्रमे आपल्या ज्येष्ठ आणि कनिष्ठ पुत्रापुढे हतबल होतात. महाभारत आणि ट्रॉय युद्ध या दोन्हीही कथा एका स्त्रीमुळे घडल्या आहेत. अकिलीस्च्या सर्वात जवळ जाणारे पात्र म्हणजे अर्जुन आहे. दोघेही शौर्य आणि चपलता यांच्या योगे युद्धात अजोड आहेत, परन्तु तितकेच साधे आहेत.

महाभाराताचा हीरो कृष्ण  तर इलियडचा हीरो अकिलीस आहे. पण कृष्णाला सर्वात जवळ जाणारे पात्र म्हणजे ओदिसिआस आहे. तो हातात शस्त्र तर धरतोच, शिवाय युक्तीच्या गोष्टी सांगुन ग्रीक सेनेला विजय मिळवून देतो. तो ग्रीकान्साठी तारणकर्ता आहे, एकाचवेळी तो शूर योद्धा, धूर्त राजकारणी आणि  हिकमती मुत्सद्दी आहे. जेव्हा Paris ने हेलनला स्पार्टाहून पळवले, तेव्हा संपूर्ण ग्रीसच्या राजांना युद्धासाठी एकत्र आणण्यात त्याची भूमिका खूप मोलाची होती. जेव्हा अकीलीसचा मोहिमेसाठी शोध सुरु झाला, तेव्हा ओदिसिआसनेच स्त्रीवेशातील अकीलीसला बाहेर काढण्यासाठी युक्ती काढली. अकीलीसच्या राजवाड्याबाहेर त्याने रणशिंग फुंकले, तेव्हा अकीलीसच्या बरोबर असलेल्या सख्या घाबरून पाळल्या, पण अकिलीस मात्र तलवार घेऊन सावध झाला आणि त्याचे पितळ उघडे पडले. तसेच युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात लाकडी घोड्यात सैनिक लपवण्याची विलक्षण कल्पनादेखील त्याचीच होती. (ट्रोजन हॉर्स म्हणतात तो हाच)

पण इलीआडचा अजून एक विशेष म्हणजे त्यातील देवदेवता. भारतीय देवदेवतान्प्रमाणे त्या वरदान देवून गप्प न बसता आपल्या आवडत्या वीरांना मदत करण्यासाठी खुशाल स्वत: युद्धात उतरतात आणि एकमेकानादेखील इजा करतात. कितीतरी घटनांचे स्पष्टीकरण होमर देवदेवतांच्या रागलोभाचा संदर्भ देऊनच करतो. इलीयडची सुरुवातच मुली एका देवाच्या रोषामुळे घडलेल्या घटनेने झाली आहे. यामुळे हे देव इंद्र  इत्यादी देवांच्या जास्त जवळचे वाटतात. आणि जरा काही झाले, की राजे आपल्या पुराणात जसे तप करतात, तसे इथे बळी देतात. फक्त ऋषी तेवढे इलीयड मध्ये आढळत नाहीत. बाकी अप्सरा, गंधर्व इत्यादी बरेच आहेत. विशेषत: हीरोज – म्हणजे यांच्या आईवडीलापैकी एकजण साधा माणूस आणि दुसरा यक्ष, अप्सरा अथवा देव असू शकतो.

काही जण ट्रोजन युद्ध आणि रामायणातलेही समान धागे काढतात. जसे रामायणात सीतेचे हरण केले होते तर इलियड मध्ये हेलन चे. रामायणामध्ये राम सैन्य घेऊन लंकेवर चाल करून जातो. तसेच इथेही.

सम्युएल बटलरची निवेदनशैली ओघवती आणि महाकाव्याला साजेशी आहे. अस्सल व्हिक्टोरियन इंग्लिशमधील पल्लेदार वाक्ये वाचता वाचता होमरच्या शैलीचा देखील काहीसा अन्द्दाज येऊ लागतो. इलीयड, ओडिसी आणि एकूणच ग्रीक क्लासिकल शैलीचे उत्तम रसग्रहण http://www.ikanlundu.com/classicground/index.html या लिंकवर मिळेल. जिज्ञासूनी विकिपीडिया पाहावा, त्यात बऱ्याच लिंक्स आहेत. मी जो अतिशय धावता आढावा इथे घेण्याचा प्रयत्न केला आहे, त्यातून जर कुणाची उत्सुकता चाळवली गेली तर मला समाधान आहे.

.                                                                                                                                  - निखिल बेल्लारीकर

(सप्टेंबर २००७ मध्ये सिओइपि हिस्टरी क्लब चे पहिले सेशन झाले. तेव्हाचा विषय ट्रोजन युद्धच होता.)

धन्य ती यावनी कथा

होमरचे इलिअड आणि ओडिसी वाचावे असा कैक वर्षापासून बेत होता…ट्रॉय सिनेमा पाहिल्यानंतर तर माझी उत्सुकता जास्तच चाळवली गेली….. त्यातली ती लढाई ची दृश्ये, मुख्यतः अकिलीस चा माज मनात घर करून राहिला…..’ग्रीक महाभारत’ असा लौकिक असलेली ही नेमकी कथा आहे तरी कशी, हे पहावे म्हणून इन्टरनेट वर सर्च मारला, आणि http://classics.mit.edu/Homer/iliad.html या लिंक वर त्याचे इंग्लिश भाषांतर हाती लागले…

होमर हा ग्रीक काव्याचा जनक मानला जातो. साधारणपणे इसवी सनापुर्वी ८ व्या शतकात त्याने इलियड रचले, अशी परंपरा आहे.  इलियड चे कथानक हे ट्रॉय च्या युद्धाच्या १० व्या वर्षात ज्य़ा घटना घडल्या, त्यावर आधारित आहे. जसजसे मी इलियड चे एकेक सर्ग वाचू लागलो, तसतसे त्यातील अनाकलनीय  नावांचे ते योद्धे, मन मानेल त्याला वरदान देणारे, आणि आपल्या भक्ताला दुसऱ्याच्या भक्ताने का मारला म्हणून आपआपसात शिवीगाळ करणारे ते मनस्वी देवी-देव. हे मनात खोलवर भिनू  लागले, आणि अकिलीस हे नाव उच्चारल्याबरोबर ‘स्विफ्ट फूटेड सन ऑफ़ पेलिअस’, ‘किंग ऑफ़ मोर्मिडोंस’ अशी बिरुदावली आपोआप मागे येऊ लागली.

इलियड मध्ये शेकडो पत्रे आहेत, राजे, रंक, देव-देवी, सर्वांची रेलचेल आहे. पण याचा नायक आहे अकिलीस…साऱ्या ग्रीसचा राजा अगमेम्नौन विरुद्ध बोलायचे आणि ते आचारायचे धाडस करणारा एकांडा शिलेदार…त्याच्या नावाचा अर्थच “शत्रूचे दुक्ख ” असा आहे ….पण होमर सुद्धा अकिलीसची स्तुति सरळ न करता त्याच्या अभावामुळे ग्रीक सैन्याचे कसे हाल झाले, त्याचे वर्णन करतो. त्याची पार्श्वभूमी दुखाची आहे.

इलियड सुरु होते ट्रॉयच्या युद्धाच्या एका निर्णायक टप्प्यावर. ग्रीस पासून निघून आता १० वर्षे उलटली आहेत, आणि ग्रीक सैनिक दिवसेंदिवस घरी जाण्यासाठी अधीर झालेत.  त्यातच प्लेगची साथ देखील आली असून अस्मानी-सुलतानीने ग्रीकांची पुरती वाताहत झालीय. ग्रीक छावणीवर दुखाची गडद छाया पसरली आहे. ट्रॉय तर शरण येण्याचे नाव घेत नाही, आणि हेलेनला परत आणण्याचे मेनेलोस चे स्वप्न अपुरे राहते कि काय, असे वाटत असतानाच ब्रीसीस नामक एका साध्या पुरोहित कन्येमुळे घटनाक्रम जणू ढवळून निघतो…प्लेगची साथ निवारण करण्यासाठी अपोलो देवाला अगमेम्नोनने आपल्याकडची एक दासी अर्पण करावी, अशी एका पुरोहिताने विनंती केली, ज्याला आपल्या मुलीची सुटका करण्याचा हा एकमेव मार्ग होता. अगमेम्नोनने संमती तर दिली, पण त्याबदली आपल्याला अजून कोणीतरी दासी हवी,अशी मागणी केली.

आणि अकिलीस अगमेम्नोनवर घसरला….राजसभेत विषयासक्तिबद्दल अगमेम्नोनची त्याने यथेच्छ निंदा केली, ज्यामुळे अगमेम्नोनला राग आला आणि त्याने अकिलीसकडची दासी हिरावून घेतली… यामुळे अकिलीसचा स्वाभिमान दुखावला जातो आणि तो प्रतिज्ञा करतो की आता शस्त्र म्हणून धरणे नाही. अकिलीस नाही; बिचाऱ्या ग्रीक सैनिकांचे हाल आता कुत्रे खात नव्हते. अकिलीस सारखा भक्कम आधार आता त्यांना रणांगणात दिसणार नव्हता , आणि हेक्टरने रोज त्यांचे शिरकाण आरंभले होते….
पण अचानक एक महान योगायोग घडला…अकिलीसचा सर्वात जवळचा मित्र पट्रोक्लास ला अकिलीस समजून हेक्टरने मारले….

आणि इथे अकिलीस पेटला…..त्याने ट्रोजन फौजांचा संहार सुरु केला. जसा महाभारतात अर्जुन तसाच तो “अन्झेपेबल” होता…..त्याचे लक्ष फ़क्त आणि  फ़क्त हेक्टरकड़े होते…….त्याचा आवेश पाहून हेक्टर त्यापासून पळू लागला. तीन वेळेस त्याने अकिलीसला हुकवले, पण शेवटी अकिलीसने त्याला आपल्या भाल्याने क्षणात यमसदनी पाठवले…..मग ट्रॉयचा राजा प्रीआमने अकिलीसची विनवणी करून हेक्टरचे शव परत ट्रॉय मध्ये आणून त्याला अग्नी दिला……. इलीआड ट्रॉय युद्धाबद्दल एवढेच सांगते.बरेच धागेदोरे हाती लागत नाहीत.

पुढे बऱ्याच घडामोडी होऊन अखेर ओडीसिअसच्या युक्तीने ग्रीक सैनिक लाकडी घोड्यात बसून ट्रॉय मध्ये शिरतात आणि ट्रॉयचा सर्वनाश होतो…..(क्रमश:)

- निखिल बेल्लारीकर
(परिचय – प्रस्तुत लेख निखिल बेल्लारीकर ने लिहिला आहे. हा माणूस इतिहास (मुख्यतः मध्ययुगीन भारत), आणि गणित तज्ज्ञ आहे. आणि उत्कृष्ट वक्ता देखील. परमेश्वराची स्मरणशक्तीची देणगी यांना मुक्तहस्ताने लाभली आहे. मेघदूतही घडा घडा म्हणू शकतो. या व्यतिरिक्त हा माणूस मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, बंगाली, उर्दू, संस्कृत आणि ग्रीक भाषा जाणतो. पुरातन संकृत, इंग्रजी आणि मराठी काव्य हा याचा खास अभ्यासाचा विषय आहे. कॉलेज मध्ये असताना आम्ही सुरु केलेल्या ‘हिस्टरी क्लब’चा हा २ वर्षे प्रेसिडेंट होता. इन्जिनिअरिन्ग संपवून आता गणितामध्ये पुढील शिक्षण घेत आहेत)

Follow

Get every new post delivered to your Inbox.