रारंगढांग

by Nikhil Sheth

आत्ता परत असंच रारंगढांग वाचत होतो. एक पत्र मिळाले. बेष्ट आहे.

चि. विश्वनाथ यास,
अनेक उत्तम आशीर्वाद.
तुझे पत्र पावले. मुंबईतील नोकरी सोडून हिमालयात रस्ते बांधण्याच्या कामावर तू दाखल झालास हे समजले. एक नोकरी तू का सोडलीस हे कसे समजले नाही, तसेच दुसरी का घेतलीस हेही समजले नाही. केवळ चरितार्थाची सोय हा तुमच्या नोकरीचा उद्देश आणि चांगली नोकरी मिळवणे हा तुमच्या जीवनाचा उद्देश असतो काय, हे माझ्या सारख्या आयुष्याची संध्याकाळ झालेल्या माणसास समाजाने कठीण आहे.
कारण आमच्या वेळी तसे नव्हते. निदान माझ्या बाबतीत तसे नव्हते. त्या वेळची माणसे ‘स्वातंत्र्य’ ह्या शब्दाने, विचाराने झपाटलेली होती. पहावे तिकडे एकेक माणूस त्याकरता पहाडासारखा ठाम निर्धाराने उभा राहिलेला आम्हा तरुणांना दिसे. आज त्या माणसांच्या पुतळ्यांवर साठलेली धूळ कधी स्वातंत्र्यदिनाच्या निमात्ताने निघत असेल तर असेल. पण ज्याकरता त्यांनी आपले जीवन अर्पण करून देशभक्तीचा, त्यागाचा वन्ही चेतवत ठेवला, त्या अद्नीच रक्षादेखील विभूती म्हणून लावण्यासाठी आता शिल्लक उरलेली दिसत नाही.
नव्या नोकरीमुळे तू मुंबईबाहेर पडलास हे एका अर्थी चांगले झाले. मुंबईचा माणूस हा सतत धावत असतो. पण दुर्दैव की त्याचे हे धावणे हे सापळ्यात सापडलेल्या उंदराचे धावणे असते. कितीही धावला तरी तो ज्या जागी असतो त्याच जागी राहतो.
हिमालयात तुला निदान शांतता मिळेल, जी मुंबईतल्या माणसानं कायमची गमावली आहे. ही शांतता स्वतःशी बोलण्यासाठी वापर. ‘मी कोण?’ हा विश्वातला सगळ्यात गहन प्रश्न. स्वतःला पाहणे हाही एक साक्षात्कार होऊ शकतो. मी हे का करतो या प्रश्नाचे उत्तर शोधणारा माणूस जसं अनावश्यक अनेक गोष्टी करणे टाळतो तसा काही गोष्टी कोणत्याही परिस्थितीत झाल्याच पाहिजेत ह्या निर्धाराने उभे राहायचे ठरवतो. ह्या गोष्टी कोणत्या हा शोध प्रत्येकाने स्वतःच घ्यायचा असतो. त्या एकदा ठरल्या की त्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता झगडणं हाच जीवनाचा उद्देश असतो असे मला वाटते.
मी या वयात जितका असायचा तितका ठीक आहे. स्वतःस सांभाळावे.
कळावे. हे आशीर्वाद.