भारतवारी?
by Nikhil Sheth
काळ लोटला. मध्यंतरी पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. जसे मी हे लिहितो आहे तसे ते अजून वाहतेच आहे… सतत अथक… त्याच्याकडे बघता बघता विचार करून करून आपण थकून जाऊ. पण ते थांबणार नाही.. कालप्रवाह आहे… अचंबा वाटावा असा… शाळेत कधीतरी वाचले होते.. ‘काळाच्या या कराल दाढा.’..
कितीतरी दिवस ब्लॉग पासून दूर आहे. या वर्षाच्या सुरुवातीला लिखाण सुरु केले. १०० दिवस १०० पोस्ट्स लिहिल्या. नंतर मात्र संकल्प संपला आणि लिखाण अतिशय बेजबाबदार आणि बिनाशिस्तीचे झाले. कर्मयोगाची आठवण झाली का? पर्पज संपतो अन मग काम करण्यामागची प्रेरणा संपून गेली तर? काम करण्यात खरं राम आहे. साध्य करण्यात नव्हे. १०० आर्टिकल्स लिहिण्यात राम नसून व्यवस्थित नेहमी लिहिण्यात राम आहे… पुन्हा यत्न करून पाहू…
आजकाल तसेही मराठी वाचायची फारशी वेळ येत नाही. रादर journals, reports, theses यापुढे आमची गाडी फार तर फार ‘द हिंदू’ ची वेबसाईट नाहीतर गेला बाजार पीएचडी कॉमिक्स वाचणे… मर्ढेकर, गालिब, टोलस्तोय, खय्याम, तेंडूलकर, कुसुमाग्रज, बोरकर, दुष्यंत कुमार म्हणजे ‘किस देस के लोग’ झाले आहेत. दहावीनंतरच्या सुट्टीमध्ये तीन महिने किती पुस्तके वाचली होती… पुमग्र म्हणजे दुसरे घर झाले होते…हरकत नाही…नाही म्हणायला कुमारजी आणि वसंतराव मदतीला येतात.. पण तेसुद्धा स्ट्रेस बस्टर म्हणून… निर्मल आनंदासाठी नाही. दुर्दैव.
भारताची पाहिली वारी जवळ येत आहे. त्याबद्दल उत्सुकता आहेच. दीड वर्ष म्हणजे काही ‘हाये कितने बरस बीते’ सारखे नसले तरी बराच काळ आहे. पुण्यात बरेच काही करायचे आहे. राजगड बोलावतो आहे असे वाटते. बरेच प्लान्स केले होते, त्यातला एक होता म्हणजे प्रभाकर पेंढारकर यांना भेटायचे. जी काही मराठी मध्ये उत्कृष्ट पुस्तके आहेत त्यातले एक म्हणजे रारंगढांग त्याचे ते लेखक. भालजींचा मुलगा. भालजी म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीमधला मोठा माणूस. त्यांचे चरित्र वाचले आहे का? ‘साधा माणूस’ नावाचे? नसेल तर जरूर वाचा. भारी आहे एकदम. तर पेंढारकरांना भेटायला मागे एकदा गेलो होतो तेव्हा ते घरी नव्हते. भेट झाली नाही. आता दीड वर्षांनी परत जाण्याचा विचार होता तर आता ते या जगातच नाहीत… खंत आयुष्यभर राहील.
असाच एक जुना मित्र. ज्याच्याशी इमेलवर संपर्क साधतो. मेलामेली चालू असते. हे महाराज सध्या इंग्रजी साहित्यामध्ये पदवी मिळवत आहेत. आणि त्यांचा आक्षेप असा की माझे इंग्रजी आता पूर्ण अमेरिकनाळलेल आहे. मग जरा मागचे जुने काही मेल्स काढून वाचले… खरंच चायला… अमेरिकन इंग्रजीचा मी काही फारसा चाहता नाहीये.. (I am not a big fan of… या अमेरिकन म्हणीचे भाषांतर आले इथे परत…!!) अर्थात Hemingway, Pearl Buck आणि Ayn Rand च्या वाचनातून नकळत थोडेसे संस्कार झिरपले असावेत… पण त्याहीपेक्षा बहुधा हा प्रभाव सिनेमांचा असावा… ब्रिटीशांचे इंग्रजी सिनेमे पाहणे अगदी तुरळक झालंय आता…हा.. एक मात्र आहे.. वाचन जरी कमी झाले असले तर सिनेमे पाहणे मात्र जोरदार सुरु आहे… श्याम बेनेगल जवळ जवळ संपवला… मध्यंतरी एक डेज इन हेवन नावाचा सिनेमाटोग्राफीसाठीचा अतिशय जबरदस्त सिनेमा पहिला.. वर्णन करायला शब्दच नाही… यात कथा आहे पण फारशी जोरकस नाही. कलाकार तेव्हा तसे नवेच होते. पण एक एक फ्रेम म्हणजे एक एक उत्कृष्ट चित्र आहे.. पाहता पाहता आपण त्यात इतके गुंगून जातो की कोण सेट वर येतात, कोण बोलताय काय चाललंय काहीही फरक पडत नाही.. फक्त ‘बघत’ राहावा असा सिनेमा… खऱ्या अर्थाने ‘चित्र’पट आहे हा… एक अनुभवच होता.. त्या काळा-दिग्दर्शकाने म्हणे हा चित्रपट बनवल्यार पुढची २० वर्ष दुसरा कोणातच चित्रपट बनवला नाही….
पुण्यामध्ये करण्याच्या यादीमध्ये सवाई गंधर्व बसायला पाहिजे होता खरं.. पण नाही होणार. मागच्या वर्षीपण बुडाला होता… सिओइपि-मध्ये चांगले होते. परीक्षा बरोब्बर सवाई सुरु व्हायच्या १-२ आठवडे आधी संपायची.. तिकडे ग्रीनरूम म्हणजे जणू काही आपल्या बापाची खोली आशा थाटात मागे जाऊन प्रत्येक कलाकाराला भेटून, २-४ वाक्य बोलून सह्या घेऊन येऊन मिरवायचा एक काळ होता. हरिप्रसाद चौरसिया, भीमसेन जोशी, आरती अंकलीकर, परवीन सुलताना सगळ्यांशी बोलून आलो होतो.. उगीच भारी वाटायचे… गाणे ऐकणे कमी (जे तसेही काळात नाहीच) आणि इतरच गमजा… तरी मजा होती.
५ दिवस कोलकात्याला जाणारे. असंच फिरायला. भारताचा पूर्व भाग कधीच पहिला नाही. शांतीनिकेतन, बेलूरचा माठ बघून येऊ. इंग्रजांची पहिली राजधानी. बॉम्बे प्रेसिडन्सी, सुरत आणि मद्रास चे ब्रिटीश सारे लोक कलकत्त्याला रिपोर्ट करत असत. गव्हर्नरचे घर पण तिथेच होते. राष्ट्रवादी चळवळ, क्रांतीकार्यांचे माहेरघर, कम्युनिस्टांचे माजघर, बुद्धिवादी नव-मध्यमवर्गाची पडवी, भारतीय सिनेमाचे अग्रदूत असलेल्या अनेकांचा व्हरांडा आहे. पण त्याहूनही भारी म्हणजे भक्ती मुव्हमेंटचा वेगळाच अविष्कार बांग्ला मध्ये आहे ज्यात हिंदू-मुस्लीम समीकरण अजबच आहे. गालिब म्हणतो न – कलकत्तेका जिक्र जो किया तुने हमनशीन, एक तीर मेरे सिनेपे मारा की हाय हाय…!
एक महत्वाची गोष्ट – इतिहास संशोधन मंडळ. बेल्ल्याला पकडून कीं आठवडाभर तरी रोज तिथे जाण्याचा मनसुबा आम्ही मनी धरला आहे. आई जगदंबेच्या कृपेने त्यात नक्की येश मिळेल. एकदा असेच बाबासाहेबांना भेटायला गेलो होतो. त्यांना कोणाचा तरी फोन आला… आम्ही बाजूला उभे होतो.. ‘आम्ही पर्वतीजवळच्या पुरंदरे वाड्यावर आहोत… हो हो xxxराजांचे आगमन अजून येथे झाले नाही… मुकुंदराव जरा आम्हास पाणी देता आणता का…आपण आसनावर बसा न…’ आणि त्यांच्या दिवाणखान्यात आजूबाजूला तरवारी आणि हंडे वगैरे फुल ऐतिहासिक वातावरण… हा माणूस इतिहास लिहितो, बोलतो, अभ्यासतोच नाही तर अक्षरशः इतिहास जगतो. बेडेकरांबरोबर जेव्हा जेव्हा बोलायचो तेव्हाही असेच जाणवायचे.. उठता बसता हे लोक काहीतरी फाटकन बोलून जातात की ऐकणाऱ्याने फक्त ऐकावे. शेवटी इतिहासाचे मार्केटिंग करणे तेही पुण्यामध्ये फारसे सोप्पे नाहीये..:)
यंदा हिस्टरी क्लबचा चौथा हिस्टरी वीक. भारी होईल यात शंकाच नाही. फिरून पुन्हा एकदा पहिला हिस्टरी वीक आठवतो आहे. फुल धमाल होती. उगीच ‘इवलेसे रोप लावियले द्वारी’ ची भावना मनात यायला लागली तर? वटवृक्ष होणे अजून फार लांबची गोष्ट आहे खरे पण निदान मूळ बाळसे धरू लागले आहे.
बरेच लोक मार्क करून ठेवले आहेत त्यांना भेत्याचे आहे. बरेच मित्र आहेत. बरीच हॉटेले आहेत. काही काही पुस्तके आणायची आहेत. काय काय काय काय…. असो. या गोष्टी इथेच थांबवतो. कारण संकल्पना करून ठेवणे चांगले जमते. प्रत्यक्षात किती येतात ते बघू.
Rarang Dhang! apratim pustak.. one of my fav marathi books..
अगदी.. माझेही…:)