हम अपने पैरोंमे जाने कितने, भवर लपेटे हुए खड़े है
by Nikhil Sheth
काम करायचा आळस असेल तर ‘विचार चालू आहे’ हे कारण मस्त आहे द्यायला… तो करताना दाखवावा लागत नाही की काही नाही… ब्लॉगचेही तसेच; नव्याने लिहायला सुरु करेन सुरु करेन म्हणतो आहे, पण नुसतेच म्हणतो आहे. कल्पना अशी होती की उधार-उसनवारी खूप झाली. इतरांच्या कविता, दाखले, शेर, इतिहासातल्या कथा, साहित्यातले मासले बरेच काही लिहून लिहून पोस्ट्सचा पाऊस पाडता येईल. आला देखील. ब्लॉग सुरु केलाच तेव्हा ठरवले होएत १०० दिवस १०० पोस्ट्स. आणि ते जमले. लोकांनी बऱ्यापैकी वाचले. पण त्यात आता मजा वाटणे थांबले. याचा अर्थ असा नव्हे की स्वतःच्या कथा/कविता/ललित लिहिणार. बिलकुल नोहे. पण स्वानुभवावरून आणि स्वतःच्या विचारांवर आर्टिकल्स लिहायचे आहे. जे वाचले ते थोडा वेळ बाजूला ठेऊ. जे दिसते ते लिहू. कसं काय?
पण जे दिसते ते कळले पाहिजे, आकळले पाहिजे आणि त्यातून काहीतरी लेखनीय स्फुरले पाहिजे. सोप्पे नाहीये हे. त्यामुळे मग शेवटी लिहिणेच बंद करून टाकले. मग गाडी परत वाचनाकडे वळली. त्यातून काही बघू सुचते का. किंवा आता लवकरच एक १० दिवसांची ट्रीप करणार आहे. त्याची डायरी होईल चांगली. सध्या भारतातून अमेरिकेत शिकायला येणारे नवे पब्लिक बरेच आहे. आगरकरांनी म्हटल्याप्रमाणे ‘एकदा सांगून भागत नाही. कालावकाशाने पुनरुक्ती करत राहावी लागते’ या न्यायाने ते अनुभव जरी पुष्कळ असतील तरी ते लिहिता येतील. इथल्या सिस्टीमबद्दल तर चिक्कार आहे लिहिण्यासारखे. पण इतरांना वाचायची इच्छा नसावी आणि असेल तरी ती इतर ठिकाणी पूर्ण होत असावी म्हणून लिहित नव्हतो. पण आता मात्र तो चाप्टर एकदा लिहून काढता झाला पाहिजे. नाहीच जमले काही तर मग पेटंट विषय आहेतच.
असे करतो त्या ट्रीपच्या डायरीनेच सुरुवात करतो. साली पण कविता सांगायची हौस काही पुरत नाही. ही सुचली -
जहासे तुम मोड़ मुड़ गए थे, ये मोड़ अबभी वही पडे है,
हम अपने पैरोंमे जाने कितने, भवर लपेटे हुए खड़े है… गुलझार.