दिसामाजी काहीतरी

Month: एप्रिल, 2010

मनोगते

बेल्लारीकर तसा एक चक्रमच मुलगा आहे. इंजिनियरिंग मध्ये दुसऱ्या वर्षाला असताना आमची ओळख झाली. बोट क्लब वर काहीतरी वाद घालत बसला होता. नंतर कळले की हा पण आपल्यासारखाच (सं)वाद-प्रिय मुलगा आहे म्हणून… फक्त वादाचे विषय एकदम आर्केन असतात… गणितात डेरीव्हेटिव्ह शिकवले होते… डेल्टा-अप्रोक्झीमेशंस पण शिकवली होती.. पार्शियल पण शिकलो होतो पण कधी अपूर्णांकात डेरीव्हेटिव्ह नव्हते बघितले आणि ते असतात म्हणून हा ओरडून ओरडून सांगत होता. कोणी ऐकतच नव्हते… (हे पण नेहमीचच.. अपवाद एकच – ‘ती’ संस्कृतमध्ये लिहिलेली गोष्ट मात्र अख्ख्या होस्टेल ने ऐकली-वाचली होती) तेव्हा पासून मैत्री झाली.

शब्द-प्रभू आहेच. इतिहास, क्लासिकल मराठी लिटरेचर, गणित (त्यातही नंबर थिअरी, आणि आता संख्याशास्त्र), ग्रीक मायथोलोजी यावर कमांड आहे… पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचा आणि एकंदरीतच मध्ययुगीन भारताचा सखोल अभ्यास, मराठी, इंग्रजी, हिंदी या व्यतिरिक्त कन्नड, तेलुगु, बांग्ला, उर्दू, ग्रीक आणि संस्कृत ही या भाषांवर प्रभुत्व….(याचे वय २१ कसे शक्य आहे?) ( या गोष्टीकरता प्रचंड असूया वाटते याची… मी किती वर्ष अजून उर्दू-फार्सी वरच अडकून पडलो आहे) मिरजेचा इतिहास नि महादेव विनायक रानडे (चापेकरांचे सह-क्रांतिकारी), गोडेल, भारत इतिहास संशोधन मंडळ, ट्रोय चे युद्ध, John Nash हे म्हणजे अगदी जिव्हाळ्याचे विषय.. पाठांतर म्हणजे आ वासावे इतके… मग ते मेघदूताचे असो, पुलंच्या गाळीव इतिहासाचे की सखाराम बापूंच्या पत्राचे, ओमर खय्याम असो की रिचर्ड बर्टनच्या सुरस कथा……… पानेच्या पाने घडाघडा म्हणून समोरच्याला चाट पडणे यात स्वर्गीय आनंद लाभतो याला…

याचे व्यक्तिचित्रण केव्हा तरी नक्कीच करणारे… आतापर्यंत पाहिलेल्या सगळ्यांत सगळ्यांत विचित्र पात्र आहे हे… पण त्याचे आत्ता प्रयोजन नाही. मुख्य म्हणजे त्याने ‘दिसामाजी काहीतरी’ वर अनेक पोस्ट्स लिहिल्या. आता स्वतःचा ब्लॉग पण सुरु केला आहे. जरूर वाचा…

डेड विक दिनक्रम

रात्री ऑफिस मध्ये राहून काम केले आणि झोपायला पहाट झाली…  रोज रात्री साडे तीन ला येणारा जेनीटर ओळखीचे स्मित देवून गेला… मग लॉबी मध्येच सोफ्यावर कसाबसा मावून झोपलो… अंगावर चादर म्हणून जर्किन… झोपताना समोर काचेतून दिसतो आहे तो अंधारात पण चमकणारा बेल टोवर… हळूच डोळे मिटले की डोके अपोआप शांत झाले…. डोळे उघडतो तो आजूबाजूला खूप लोक इतरत्र चालत फिरत गप्पा मारत आहेत, क्लासेस ला जात आहेत.. बाजूला कोणी एक कपल शांतपणे ना बोलता असंच बसले आहे…. पहिल्यांदा आठवते ती कॉफी.. काल रात्री ब्रश इथे आणलाच नाही… असंच इलेक्ट्रिकल च्या एचकेएन लोंज मध्य एजून ३० सेंट ची रेग्युलर कॉफी घेतली… जाताना पॉटर लायब्ररी आणि मेक डीपार्टमेंट च्या मधून येणारा सूर्यप्रकाश… आज अंघोळ नाहीच… दुपारी अडीच पर्यंत खायला पण नाही वेळ… मग काय काय कामे उरकता उरकता, असाईनमेंट संपवताना आणि क्लासेस करेपर्यंत अडीच… मग जेवण आणि जरा सुस्ती.. परत ऑफिसच्या लॉबीमधला सोफा…. मग संध्याकाळ…. पाच वाजता लोंज बंद होतो.. त्याच्या आधी एक कॉफी घेतलेली बरी… दिवस संपत आला… चायला अर्धा दिवस फुकटच गेला की.. अजून बरेच काम करणे बाकीच आहे.. आता कसे संपणार.. आज पण परत जागायला लागणार… आज पण घरी जायला मिळणार नाही.. पण उद्या सकाळी नक्की घरी जायचे… असे म्हणून आपले ऑफिस अन लॉबी आणि त्या काचेतून दिसणारा बेल टोवर… समोर पुस्तक, इंटरनेट… रात्री कोणीना कोणी सापडतेच जेवायला बरोबर जायला… परत काम, ऑफिस आणि लॉबी… रात्रीचे साडे तीन… जेनीटर चे ओळखीचे आणि सवयीचे स्मित… आणि पहाटे पहाटे सोफ्यावर केलेले अंगाचे मुटकुळे…

त्रिवेणी

जपान म्हटलं की काय आठवते? झेन कथा, हायकू, इकेबाना, बोन्साय, ओरिगामी, गेयशा, कोडो, बर्नाकू, काबुकी, खान्जी……. हे सगळे ऐकून असतो. कशाचा अर्थ काय ते थोडक्यात माहित असते पण त्याबद्दल फारसे ऐकले नसते… ‘जपानची संस्कृती = उपरिनिर्दिष्ट शब्द’ असे एकच समीकरण आपल्या मनात असते… फार तर फार कोणा रसिक चहा प्रेम्याला ‘साडो’ अनुभवायची इच्छा असते. तरी पण हायकू आणि झेन कथा आपल्याकडे पुष्कळ आल्या आहेत. शांताबाई आणि इतरांनी पण त्यावर बरेच लेखन केले आहे. गुलझार साहेबांनी तर हिंदी मध्ये शायरीला नवे आयामच प्रदान केले. शेर असतो २ ओळींचा. उल्ला-मिस्रअ आणि सानी-मिस्रअ.. पाहिली ओळ आणि दुसरी ओळ… उर्दू काही फारशी अवघड नाहीये बघा. पाहिली ओळ मधला ‘पहिली’ साठी जो शब्द आहे तो आहे उल्ला त्याच्या जवळचा उर्दुच पण आपल्या ओळखीचा शब्द म्हणजे अव्वल. पहिला. प्रथम… तर अशा २ ओळी असतात. आणि अनेक शेरांची मिळून गजल बनते. जरी संपूर्ण गजलेला अर्थ असला आणि त्यात एक फ्लूईडीटी असली तरी प्रत्येक शेर हा पण स्वतंत्रपणे अर्थसंपूर्ण असायला लागतो.. आणि मग त्यानंतर काही काफिया-रदीफ ची बंधने असतात… अजून काही डीटेल्स आहेत. पण २ ओळी या कायम २ च असतात. गुलजार साहेबांनी त्यात तिसरी ओळ टाकली. आता आहे तो शेर तसाच आहे. २ ओळींना मिळून पूर्ण अर्थ आहे. आणि त्यात तिसरी ओळ आली की पहिल्या २ ओळींमधून जो अर्थ अभिप्रेत झालेला असतो तो एकदम बदलून जातो. एकदम वेगळेच दालन उघडावे, वीज चमकावी किंवा १८० अंशाचे वळण घ्यावे.. असे काहीतरी धक्का तंत्र तरी असते किंवा.. जाऊ दे काहीतरी वेगळाच प्रकार आहे. हायकूच्या जवळ जाणारा आहे पण हायकू नाही. तुम्हीच वाचा -

कोई चादर की तरह खींचे चला जाता है ये दरिया..कौन सोया है तले इसके जिसे ढूंढ रहा है?
डूबने वालेको भी चैनसे सोने नहीं देते…
किंवा
ये मना इस दौरान कुछ साल बीत गए है, फिर भी आँखों में चेहरा तुम्हारा समाई हुई हु..
किताबोंपे धुल जमनेसे कहानी कहा बदलती है?

मानवी नात्यांवर तर हे किती सुरेख आणि विराण आहे बघा -

ना हर सहर का वो झगडा, ना शब् की बेचैनी,
ना चुल्हा जलता है घर में ना आखें जलती है..
कितने अमनसे घर में उदास रहता हु…

इथे गुलजार साहेब स्वतः त्रिवेणी म्हणजे काय ते समजावून सांगत आहे बघा..

महु-पुराण..!

काही माणसे, काही प्रसंग, काही ठिकाणे… उगीच कारण नसताना मनात घर करून असतात. त्यांच्या बाबतीत काही स्पेशल असते असे नाही, पण असतात. काही वेळा काही घटना घडल्या म्हणून तर काही वेळा का नाही घडल्या म्हणून…

एकदा मागे मध्ये-प्रदेश दौरा करून आलो होतो. आपण ज्याला ट्रीप म्हणतो ती ९९% वेळा अगदी तिऱ्हाईत, परदेशी, अनोळखी, अलिप्त व्यक्तीसारखी त्या प्रदेशाला दिलेली भेट असते. ना तिथले लोक कळतात ना तिथली संस्कृती. काचेच्या अलीकडून पाहिल्यासारखे अंगावर काही शिंतोडे ना उडवून देता जर त्या भागाला भेट दिली तर पोकळ समाधानच मिळते. ती सहल मग फोटो काढण्यासाठी आणि इतरांना ‘मी तिथे जाऊन आलो’ सांगून फुशारक्या मारण्यासाठी होऊन जाते. किंवा स्वतःलाच ‘मी जाऊन आलो बर का, आता छान वाटून घे’ असे समजावण्यासाठीची ती सहल. रोजच्या आयुष्यातून बदल आणि विरंगुळा म्हणून ठीक आहे पण त्याने तुम्ही त्या भागल खरी भेट देत नाही. स्वतःपासून पळण्यासाठी आपण कामात मग्न असतो आणि कामापासून पळण्यासाठी इतर लोकांमध्ये आणि अशा ट्रिप्स मध्ये. असो. उगीच फिलॉसॉफी देणे आपला धंदाच आहे.

तर ट्रीपला गेलो होतो. इंदौर, उज्जैन, मांडवगड, ओंकारेश्वर वगैरे बघून आलो. नवा प्रदेश होतं, नवे लोक होते आणि एकंदरीतच भारताच्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक भूगोलाचे ज्ञान कमी असल्याने खूप नव्या गोष्टी कळल्या. सांदिपनी आश्रम असो नाहीतर मांडू… खूप भारी होते सगळे. नंतर वर्षभराने पुन्हा एकदा ‘बहा’ स्पर्धेच्या निमित्ताने पिथमपूर ला जाणे झाले. दोन्ही वेळेस महू नावाचे गाव लागले. ११-१२वी मध्ये एक मित्र होता त्याचे बाबा आर्मी मध्ये होते आणि तेव्हा महूला स्टेशंड होते. त्यामुळे महू म्हणजे भारतीय लष्कराचे एक ठाणे एवढीच ओळख… पण परवा गुगल करता करता महूची जी जी माहिती वाचली तसा अवाकच झालो… दोनदा महू ला टच करून आलो तरी हे माहित नव्हते म्हणून वाईट पण वाटले. महू हे एक अजब रसायन च आहे… म्हणजे पुण्यासारख्या शहराला जाज्वल्य अभिमान बाळगण्यासारखा ३००-४०० वर्षांचा इतिहास असणे यात नवे काही नाही.. पण ज्या गावाचे अस्तित्व इतके पिटुकले आहे त्याचा इतिहास पण असा भरलेला आहे की काय… वाचाच वाचा..

महू ची सुरुवात होते तीच ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात… त्यापूर्वी तिथे काय होते ते माहित नाही… कंपनी सरकारचा एक तगडा अधिकारी – सर जॉन माल्कम. याचे लहानपण गेले मद्रास ला. फार्सीचा सखोल अभ्यास आणि त्यामुळेच कॉर्नवालीसने त्याची नियुक्ती त्याच्याशी रिलेटेड पदावर केली होती. (हा माणूस इतिहासकर ही आहे बर का) सगळ्यात आधी हा प्रकाशझोतात आला ते म्हणजे इंग्रज विरुद्ध टिपू सुलतान + निझाम यांच्यात झालेल्या शेवटच्या लढाईत. तिथे जोरदार पराक्रम गाजवला भाऊंनी. मग इंग्लंड ला गेला. तिथे काहीतरी नेव्ही मध्ये पराक्रम गाजवला. एक मात्र आहे, की त्या १००-२०० वर्षांमध्ये जो जो भारी इंग्रज अधिकारी होऊन गेला त्याचं काही ना काही काही कर्तृत्व नेव्ही मध्ये असतेच.. तसेच याचे पण होते. परत मद्रास ला आला.. बऱ्याच मोठ्या मोठ्या पोस्ट्स वर चढत गेला.. मुलकी आणि लष्करी दोन्ही…. रादर तेव्हा असा फरक कंपनी सरकारात तरी जास्त होते नसे… एकाच अधिकाऱ्याकडे बऱ्याचदा दोन्ही पॉवर्स असायच्या.. नशीब म्हणजे काय असते एकेकाचे.. कोणाला कुठे कुठे फिरवून आणेल सांगता येत नाही. इराणच्या इंग्रजी राजदूताची हत्या झाली आणि याला तिथे पाठवले.. तिथे राजदरबारात हे फारच रमले… वारेमाप खर्च केला. बेधुंद झाले आणि मग सगळ्यांशी भांडण करून बसले. कंपनी सरकारने परत मुंबईला बोलावले. आता काळ येतो १८००-१८१५ चा… तेव्हाचा हिंदुस्थान लक्षात घ्या… कंपनी एकेक राज्य गिळत होती. ३ इंग्रज-मराठा युद्धे, इंग्रज-शीख युद्धे, दक्षिणेतली अनेक युद्धे… संपूर्ण भारत म्हणजे रणभूमी झाला होता.. मला वाटते भारतवर्षभर स्प्रेड असलेले युद्ध १-२ दशकाच्या कालावधीत.. नि ते पण एकाच शत्रूशी.. हे पहिलेच असावे इतिहासात… अफगानिस्तान-इराण पासून म्यानमार पर्यंत आणि काश्मीर पासून श्रीलंकेपर्यंत… सगळीकडेच युद्ध-सदृश परिस्थिती… अशा वेळी माल्कम महाराजांना भराभरा पदोन्नती मिळत गेल्या.. आधी इराणचा राजदूत मग मद्रास ला मोठे कोणते तरी पद नि मग डायरेक्ट गव्हर्नर ऑफ बॉम्बे… !! आता आले साल १८१७-१८१८… म्हणजे शेवटचे इंग्रज मराठा युद्ध. आणि माल्कम साहेब बॉम्बेचे गव्हर्नर आणि मोठ्या लष्करी हुद्द्यावर…

ब्रिटीश लोकांचा खरा राग येतो जेव्हा तुम्ही त्यांनी सगळा भारत कसा मिळवला ते नीट वाचले तर.. आणि मग त्यांची न्याय-प्रियता, तंत्रात प्रगती, त्यांची पार्लमेंट.. सगळे जाते गाढवाच्या ***. तळपायाची आग मस्तकात जाणे म्हणजे काय त्या म्हणीचा अर्थ अनुभवायचा असेल तर हा १०० वर्षांचा इतिहास वाचा, गाझेटीयर्स वाचा….. १९ डिसेंबर १८१७. मध्य भारत. होळकर विरुद्ध इंग्रज. आपल्यातला अजून एक सूर्याजी पिसाळ म्हणजे गफूर खान पिंडारी. याने या दिवशी ब्रिटीशांशी गुप्त तह केला, परत छावणीत आला आणि तुळशीबाईला खलास केले. दुसऱ्या दिवशी ब्रिटीश आले लढायला आणि आपले उरलेले सेनानी म्हणजे ११ वर्षांचा मल्हारराव आणि २० वर्षांचा हरीराव होळकर.. असेही नाही की तेव्हा आपण लै भारी होतो.. खूप डीग्रेड झालोच होतो अनेकदृष्ट्या.. त्यामुळे पराभवाचे खापर शत्रूवर फोडणे म्हणजे पलायनवाद होईल. औरंगझेबने गोवळकोन्ड्याला केलेली न-गीना बाग असो किंवा ब्रिटिशांनी केलेली ही महिद्पुरची कत्तल… कोणीना कोणी ‘क़्विसलिन्ग’ असल्याशिवाय हे होत नाही हे खरे… असो. तर दुसऱ्या दिवशी युद्ध सपाटून मार खाला आणि हरलो. आणि कंपनी सरकारच्या अखात्यारीखाली हा ‘मध्य भारत’ नावाचा प्रांत आला. या युद्धानंतर होळकर महेश्वर सोडून इंदौर ला आले… नर्मदेकडून क्षिप्रेकडे…तिथून महू आहे २०-३० किलोमीटर..परत कोणी इंदूर, उज्जैन ला उचल काहु नये या कारणासाठी किंवा भारताच्या मधोमध एक असावे म्हणून… अनेक कारणांनी इंग्रजांनी इथे एक मोठा लष्करी तळ उभारला – ज्याचे नाव आहे – महू.. मिलिटरी हेडक्वार्टर्स ऑफ वेस्टर्न इंडिया चे अक्रोनिम आहे हे. And this is how Mhow came into being… हुश.. ..

तरी पण भारताच्या इतिहासात महू चे महत्व काय फक्त या घटनेमुळे नाहीये.. या युद्धात जरी होळकर जिंकले असते तरी एकंदरीतच मराठे काही फायनल युद्ध जिंकायच्या स्थितीत नव्हते.. केव्हा ना केव्हा हरणारच होते.. त्यामुळे महुचे सगळ्यात मोठे योगदान कोणते? – बाबासाहेब आंबेडकर… त्यांचे वालीद लष्करात होते, महार रेजिमेंट मध्ये. आणि महार रेजिमेंट तेव्हा काही काल होती महू मध्ये. तिथे त्यांच्या वडिलांवर कबीराचे संस्कार झाले. आणि वडिलांचे संस्कार झाले बाबासाहेबांवर. कबीर-बुद्ध-फुले असे तीन बाबासाहेबांचे गुरु होते त्यातले पहिले कबीर.. अन बाबासाहेबांचा जन्म पण महूचाच… कोण सांगणार आम्हाला हे? उज्जैनचा कुंभमेळा माहित पण महुचे महात्म्य नाही…

आणि आपण भारतीय लढण्यात एकदम निष्णात.. शत्रूशी नाही… आयुधजीवी राज्ये केव्हाची गेली.. आपल्या-आपल्यात भांडण्यात माहीर… आणि सगळ्यात दुर्दैवी म्हणजे अतिशय फालतू मुद्द्यांवरून… कोणाचे इगो कुठे कधी कसे ठेचले जातात तेच काळात नाही… जो तो उठतो तो ‘अस्मिता’ ‘अस्मिता’ करून भांडायला लागतो… इथे पण एक नामांतर वाद झाला. महू ला बाबासाहेब आंबेडकर नगर म्हणायचे की नाही? औरंगाबाद ला खडकी किंवा संभाजी नगर म्हणायचे की नाही? जे नाव बदला म्हणणारे होते ते बाबासाहेबांचे तथाकथित अनुयायी असावेत.. मला ते कोण होते ते माहित नाही.. आणि नाव बदलू नका म्हणणारे जे होते ते महू य अनावाची इमोशनली आणि हिस्टोरीकली बांधलेले होते… पोरबंदर ला गांधीनगर किंवा अलाहाबाद ला नेहरू-नगर नाही म्हणत तर महुलाच का आंबेडकर नगर म्हणायचे… बघा किती इगो -  पहिला इगो अस्मितेचा… आंबेडकरांचे खरे अनुयायी असल्या वादात पडण्यापेक्षा खरे काहीतरी कामाचे काम करतील तर खरे.. बर, या वादात पडले ते पडले.. दुसरी बाजू पण तशीच… इतिहासाची गोचीडे अंगावर पाळत बसलेली… ज्यातून कधी बाहेर पडतील तर बदलेले जग बघतील…. आणि तिसरी चूक म्हणजे ‘तुलना’.. जे काही करायचे आहे ते केस-स्पेसिफिक नाही बोलणार.. उगीच अजून इतर ३-४ गोष्टी मध्ये घुसडून वादाला अजून मोठा वाद करणे तेवढे जमते… चुकून उद्या कोणी खरंच म्हटले की अलाहाबाद ला करा नेहरूनगर तर काय घ्या.. परत नवीनच लचांड सुरु व्हायचे… आणि या सगळ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर राहिले बाजूला… ना ते मोठे-लहान होणार किंवा त्यांना कमी-जास्त मान मिळणार असेही नाही किंवा यामुळे इतर काही दृश्य फायदा तरी मला दिसत नाही… पण एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ नाव बदलायला पण हरकत नाही.. कारण त्यांचे कर्तृत्व आहे तसे.. पण भांडणे कशाला? इथे इतिहासाचा दुरुपयोग दोन्ही बाजू करतात… त्यापेक्षा लोकांनी बुद्ध आणि हिज धम्म वाचले तर जास्त उपकार होतील या देशावर…

असो. आपण जरा आपल्याला मानवेल अशा विषयाकडे येऊ. सेलिना जेटली. बॉलीवूड मधली एक हिरोईन. लोकांना आता सर जॉन माल्कम माहित असायचे काहीच कारण नाही. त्याचे (अ)कर्तृत्व २०० वर्षांपूर्वीचे… पण सेलिना जेटलीला उभ्या भारतातल्या प्रत्येक घरातले लहान मूळ ओळखते… तर तिचा जन्म काही इथला नाहीये.. हिचा जन्म अफगानिस्तान मधला.. काय स्टोरी आहे बघा हीची.. वडील लष्करात, अफगाणिस्तानात होते. तेव्हा कोण एका अफगाण हिंदू बाईला यांनी पटवले… (अफगाण हिंदू हा काय प्रकार आहे मला खरंच माहित नाही, कोणाला माहित असल्यास कळवावे) ती होती तेव्हाची अफगाणी ब्युटी क्वीन… (अफगानिस्तान मध्ये ब्युटी क्वीनच्या स्पर्धा? मी वाचलेली माहिती नक्कीच चुकीची असणारे)  आणि या दाम्पत्याला झालेली मुलगी म्हणजे सेलिना जेटली… आता हे दाम्पत्य महू मध्ये राहते… एवढाच त्यांचा आणि महूचा संबंध…..:):)

असो. इति महुपुराण…

ता. क. – अफगाण हिंदू अशी कम्युनिटी खरंच अस्तित्वात आहे. इथे त्याबद्दल वाचायला मिळेल. त्यांचा एक ब्लॉग पण आहे… इंट्रेस्टिंग..

आर्य आणि अनार्य : एक धावता (अगदी f -1) आढावा .

इतिहास म्हणजे या ना त्या कारणाने वेळोवेळी फुटणाऱ्या बॉम्बगोळ्यांनी व्यापलेले कुरुक्षेत्रच  जणू. अलीकडे तर कधी कोणत्या मुद्द्यावरून वाद , वितंडवाद आणि दहशतवाद फोफावतील, हे सांगणे कठीणच आहे. मग काल कोणताही असो , प्रदेश कोणताही असो. युरोपात पाहिले तर लोक  चेंगीज खान , अरब यांच्या नावाने बोटे मोडतात , ज्यू हिटलरला शिव्या घालतात. आफ्रिका आणि वसाहतवादाच्या जोखडातून नुकतेच मुक्त झालेले कोणतेही देश युरोपच्या नावाने खडे फोडतात .  भारतात तर असे बॉम्बगोळे  किती आहेत कुणास ठाऊक. पण या सर्व स्फोटकांचा बाप म्हणजे सो-कॉल्ड आर्यन इन्व्हेजन थेअरी . या सिद्धांतावरून जितका कंठशोष झाला, तितका अजून कोणत्याही मुद्द्यावरून झाला नाही . तस्मात या आणि अजून काही लेखांमधून याचा एक अति-अति धावता आढावा घेण्याचा प्रयत्न आहे .

हा सिद्धांत पुढे करून १९व्य शतकात ब्रिटीश लोकांनी आपल्या साम्राज्यवादाला नैतिक बैठक देण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुल्यांनी हा सिद्धांत वापरून आर्य हे बाहेरचे उपरे असून त्यांनी आधीच्या अधिक प्रगत अशा मूलनिवासी  द्रविड लोकांना पराभूत केले , असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला . बहुजनसमाजाला पारंपारिक हिंदू धर्मापेक्षा एक वेगळी ओळख देण्याचा हा प्रयत्न होता. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी   या सिद्धांताचा उहापोह “who were the shudras?”  या पुस्तकात केला आणि फुल्यान्प्रमानेच  मत दिले. तामिळनाडूमध्ये हा सिद्धांत वापरून सो-कॉल्ड द्रविडपणाला चेतविण्याचा प्रयत्न केला गेला. आजदेखील काही तथाकथित आणि पोकळ बहुजनसमाजवादी लिखाणात या सिद्धांताची मढी उकरून हवी तशी सजविली जातात.अर्थात आर्यन इन्व्हेजन थेअरी हा आर्य संकल्पनेचा एक भाग आहे. ती संकल्पना वापरून हिटलरने जो दंगा केला, तो महशूर आहे . “white man’s burden” हादेखील असाच एक रद्दी सिद्धांत आहे. पण त्याबद्दल नंतर कधीतरी .

मुळात हा सिद्धांत काय आहे? हा सिद्धांत असे सांगतो , की सुमारे १५०० इ.स .पू. या वेळी भारतात आर्य नामक लोक बाहेरून आले, त्यावेळी भारतात असलेल्या द्रविडीय लोकांना त्यांनी हळूहळू आपले गुलाम बनवले, आणि आपला वरचष्मा भारतावर प्रस्थापित केला . आर्य लोकांचा वंश द्रविड लोकांपेक्षा वेगळा होता , त्यांची भाषा देखील वेगळी होती .

तर हा सिद्धांत कोणी सर्वात आधी मांडला? याचे उत्तर देण्या आधी मुळात या सिद्धांतामागील पार्श्वभूमी थोडीशी समजावून घेऊ. १८व्य शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटीशांची भारतावरील पकड बर्यापैकी मजबूत होऊ लागली आणि बरेच युरोपियन्स भारतात येऊन भारतीय संस्कृतीचा अभ्यास करू लागले . त्याची परिणती म्हणजे “indology” ही शाखा होय. सर विलियम जोन्स हे त्यातील एक अग्रगण्य नाव आहे . संस्कृत चा अभ्यास करून त्यांनी आधीच्या लोकांनी केलेल्या तर्काला पुष्टी दिली, की संस्कृत, ग्रीक आणि लातिन या ३ भाषांची पूर्वज भाषा ही एकच होती. त्यामुळे भारत आणि युरोप यांचे सांस्कृतिक आजेपणजे एकच असावेत असा निष्कर्ष त्यांनी काढला. त्याचीच परिणती म्हणजे वरती सांगितलेला हा सिद्धांत होय . max  मुल्लर , जॉन मुइर आणि इतर अभ्यासकांनी हा सिद्धांत पहिल्यांदा मांडला.

आता या सिद्धांतातील तथ्य आणि मिथ्य दोन्ही तपासून पाहू . विलियम जोन्स हा संस्कृत भाषेचा पहिला प्रसिद्ध अभ्यासक संस्कृत बद्दल असे म्हणतो , की संस्कृत ही ग्रीक आणि लातिन यापेक्षा बाहेरून वेगळी असली तरी त्यांचे व्याकरण आणि साधारण ढाचा बर्यापैकी सारखा आहे आणि हा सारखेपणा इतका आहे , की या तीनही भाषांची मूळ भाषा १ च असावी . त्या भाषेला तो “proto-indo-european” असे म्हणतो. इतकेच नाही , तर पारशी लोकांच्या अवेस्ता नामक धर्मग्रंथातील पर्शियन भाषा आर्ष संस्कृतशी खूपच मिळतीजुळती आहे. हे झाले भाषिक पुरावे . कधीकाळी आर्य लोक हे भारताबाहेर होते याला काय पुरावा? इराणमधील प्राचीन  संस्कृती ही आर्य संस्कृतीशी मिळतीजुळती होती, पण त्यापुढे काय? पण तुर्की मध्ये बोगोझ-कोई नामक ठिकाणी मितान्नी   साम्राज्यामधील तुशारात्त राजाने इजिप्त च्या अमेनहोतेप तिसरा या राजाबरोबर केलेला  शांतता करार मिळाला क्युनिफोर्म लिपीत लिहिलेला मिळाला आहे . त्यात अग्नी, वरुण यांसारख्या स्पष्टपणे आर्यन / वैदिक देवतांना साक्षी मानले आहे . या कराराचा काळ आहे इ.स.पू . १४००   . ह्यावरून असे सिद्ध होते की भारताबाहेर देखील आर्य संस्कृती प्राचीन काळी पसरलेली होती.

पण मग द्रविड लोकांवरील त्या तथाकथित हल्ल्याचे काय? आर्य हे हल्लेखोर होते , असे म्हणणार्यांच्या मताला पुष्टी देणारा एकच अप्रत्यक्ष पुरावा आहे, तो म्हणजे पाकिस्तान मधील बलुचिस्तान भागात आजही सुमारे २२ लाख लोक बोलत असलेली ब्राहुई ही भाषा होय. जरी शब्दसंपदा अलीकडच्या काळात उर्दू फारसीने प्रभावित असली तरी व्याकरण इत्यादी प्रकारे तपासू गेलो तर ती एक द्रविड भाषा आहे , असे सर्व भाषातज्ञ म्हणतात. बाकी सर्व द्रविड भाषा दक्षिण भारतात आणि हीच एकटी उत्तरेत कशी काय? नक्की उत्तर कुणालाच माहित नाही. पण यावरून स्थलांतर हे एकच तर्कशुद्ध उत्तर निघते.

आता हा पुरावा असे सूचित करतो, की भाषेचे कदाचित स्थलांतर झाले असावे. पण मग तथाकथित आर्य वंशाचे काय? तर २००५ साली National DNA analysis centre, Kolkata , Oxford university zoology dept. ani Estonian biocentre या संस्थांमधील संशोधकांनी भारतामधील ३२ भटक्या जमाती आणि ४५ (नेहमीच्या) जाती यांमधून हजारो लोकांचे डी एन ए तपासले आणि निष्कर्ष काढला की सुमारे गेल्या ४०००० वर्षात तरी उत्तरपश्चिम भागातून मोठ्या प्रमाणावर लोकांचे कोणतेही उल्लेखनीय  स्थलांतर झालेले नाही . कुणाला हवे असल्यास त्याची पीडीएफ माझ्याकडे आहे. त्यामुळे वंशाचा मुद्दा तरी निकालात निघाला .

भारतीय संस्कृतीचा सध्या ज्ञात असलेला सर्वात जुना अवशेष जी हडप्पा संस्कृती, ती आर्य  की द्राविडी? हडप्पा संस्कृती ही आर्य नाही , असे म्हणणार्यांचा भर कायम घोडे आणि त्याशी निगडीत असलेल्या रथ आणि इतर गोष्टींशी असतो. त्यामुळे घोड्यांचा  उल्लेख असणे म्हणजेच आर्यपणाचे लक्षण आहे का? आता “आर्य /वैदिक” संस्कृतीशी निगडीत असलेला सर्वात जुना ग्रंथ जो ऋग्वेद , तो याबद्दल काय सांगतो? त्यात घोड्याचे उल्लेख आहेत , परंतु निव्वळ घोडाच नाही , तर बैल , गायी यांनादेखील महत्वाचे स्थान आहे. आता एक fact म्हणजे घोडा हा प्राणी मुळात भारतातील नाहीच. इ स पू २००० पूर्वी अश्वपालनाचे उदाहरण दक्षिण आशिया मध्ये सापडलेले नाही. तर एक गोष्ट नक्की , की घोडा हा प्राणी बाहेरचा आहे. पण मग हडप्पाचे  काय? निव्वळ  घोडा नसणे हे  द्रविडपणाचे लक्षण कशावरून?  ज्या अर्थी ऋग्वेद आणि जुन्यातील जुनी उपनिषदे सरमा-पणी यांसारख्या कथा रंगवून सांगतात आणि त्या कथा गाईंच्या  चोरीबद्दल आहेत , त्या अर्थी ती आर्य संस्कृतीची अतिशय जुनी अवस्था आहे , आणि हडप्पादेखील तसे असण्याची शक्यता आहे. अर्थात हे सगळे अवलंबून आहे ते हडप्पाच्या चित्रलिपीच्या सर्वमान्य अशा वाचनावर . तोपर्यंत आर्य आणि द्रविड या दोन्हीही पक्षांना मूग गिळून बसणे भाग आहे.

तर सारांश असा , की घोडा भारतात बाहेरून आला आणि काही प्रमाणात भाषिक स्थलांतर झाले .पण मग संस्कृत भाषा ही मूळ भारतातील आहे की नाही? द्राविडी भाषांचे भारतीयत्व निर्विवाद आहे, तर खरी “भारतीय भाषा ” कोणती?   S R Rao  या संशोधकांनी संस्कृतवर आधारलेले त्यांचे वाचन मांडले १९९२ साली , पण ते मान्यताप्राप्त नाहीये . जोपर्यंत हडप्पा बोलत नाही, तोपर्यंत आर्य आणि द्रविड ह्या दोन्हीही पक्षांना आपापला प्राचीनतेचा दावा पुढे रेटता येणार नाही.

इत्यलम!

- निखिल बेल्लारीकर (कोलकाता)

Follow

Get every new post delivered to your Inbox.