विरह…

by Nikhil Sheth

.
पिया बिन नहीं आवत चैन….झिंझोटी मध्ये जेव्हा अब्दुल करीम खान साहेब गातात तेव्हा सगळ्यात जास्त बेचैन होणारे लोक शायर असावेत. असंच जुने कुठे कुठे वाचले-ऐकेलेले शेर आठवत होतो. आणि या थीमवर अशक्य शेर आठवले…

अख्तरीबाई म्हणतात – ‘ये ना थी हमारी किस्मत की विसाल-ए-यार होता, अगर और जिते तो यही इंतेजार होता’..हे गाणे रफी साहेब आणि सुरैय्याने देखील गायले आहे. इतके सुंदर आहे की काय सांगू. मुहम्मद पैगंबर जेव्हा मक्का सोडून मदिनेला गेले, तो त्यांच्या आयुष्यातला Bad Patch चालू होता. त्यांना जन्मगाव सोडून पळून जावे लागले मदिनेला आश्रयाला. तिथे जाऊन त्यांनी मग हळू हळू त्यांचे वजन, शक्ती गोळा केली, अनुयायी मिळवले आणि मग काही वर्षांनी (बहुधा सात; कारण कुरणामध्ये सात या आकड्याला फार महत्व आहे आणि तो अनुप्रसात्मकरित्या प्रत्येक ठिकाणी येतो, ७ दिवस चाललेले युद्ध, किंवा ७७७ देवदूत असे काही ना काही आहे ) तर, ७ वर्षांनी पैगंबरांनी परत सगळे सैन्य वगैरे जमवून मक्केवर स्वारी करून जिंकून घेतली..तो त्यांच्या आयुष्यातला तडीपाराचा कालखंड ही म्हणता येईल, त्यालाच लोक हिज्र असेही म्हणतात. म्हणजेच हिजरत चा अर्थ होतो विरह. ही ‘हिजरत’ सगळे शायर लोक वेगळ्याच अर्थाने वापरतात. उर्दू ही भाषा फारच लवचिक आहे. पाहिजे तो अर्थ पाहिजे तिथून निघू शकतो. किंवा अशा वेगवेगळ्या छटा दाखवण्याची कारागिरी करणारे शायर खूप होऊन गेले. तर हिज्र म्हणजे विरह. त्याचा विरुद्ध अर्थ असलेला हा शब्द – विसाल. म्हणजे मिलन. तर विसाल-ए-यार म्हणजे यारशी मिलन. ते माझ्या नशिबातच नव्हते. ये ना थी हमारी किस्मत की विसाल-ए-यार होता. आणि मग पुढे शायर म्हणतो – जर अजून काही काल राहिलो असतो तर अशीच मला वाट पहावी लागली असती. तो और इंतेजार होता….पण वाट पाहण्याला घाबरतो कोण? आपले संत लोक तर तुझ्या वाट पाहण्यातच सगळे काही आहे असे देवाला सांगतात. कबीर म्हणतो – ‘कागा सब तन खैय्यो, चून चून खैय्यो मास, दो नैना मत खैय्यो, मोहे पिया मिलन की आस…’ मेल्यावरही कावळ्याने सगळ्या अंगाचे लचके तोडले तरी हरकत नाही फक्त प्लीज हे दोन डोळे नको खाऊस….मोहे पिया मिलन की आस, त्यासाठी तरी हे शिल्लक ठेव……तरी मी वाट पाहताच आहे…आपला विठ्ठल पण पुंडलिकाची वाट पाहत असाच उभा आहे….अनंत काळ….गोष्ट मिळवायची आस जास्त आवडते या लोकांना त्या गोष्टीपेक्षाही…बच्चन साहेब म्हणतात – पीकर मदिरा मस्त हुं तो प्यार किया क्या मदिरा से, मै तो पागल हो उठता हु सून लेता यदि मधुशाला…..

पण ती गोष्ट मिळालीच नाही, तर…किती वेळ अशी वाट पहायची? काही लिमिट? नाही ….हा एक शायर काय म्हणतो – ‘तमाम उमर तेरा इंतजार करेंगे, लेकीन ये रंज रहेगा की झिन्दगी कम है’…आता बोला. वाट पाहून मेलो आणि तू आलाच नाहीस तर असे वाटेल की वाट पाहायला हे आयुष्य कमी पडले…तू आला नाहीस याचे काही नाही. गम्मतच आहे. मेहदी हसन साहेब मात्र जेव्हा ती सोडून गेली आहे तिला परत बोलवायला ‘रंजिश ही सही’ म्हणून इतक्या वेगवेगळ्या प्रकार आळवणी करून तिला परत बोलावतात की कोणीही परत आलीच असती. पण…पण…पण….पण प्रत्येकाला काही मेहदी हसन होता येत नाही आणि म्हणून प्रत्येकाकडे ती लगेच परत येत नाही. किंवा येतच नाही. मग तो जरा माज करतो आणि म्हणतो – ‘तुम्हारे लिये कुछ नहीं है हम, मग जाके पूछो उनसे, जिन्हें हासिल नहीं है हम’…कशाला जास्त भाव खातेस..? पण जर ती तरीही आलीच नाही तर मात्र याची बेचैनी वाढते…शेवटी ‘फिरता रहू दर-ब-दर’ असे होते….मग अपरिहार्यपणे एकच मार्ग उरतो…तो कोणीतरी छान सांगितला आहे – हा माझा खास आवडता शेर आहे – ‘तेरे जानेका असर कुछ ऐसा हुआ मुझपे, तुझे ढूंढ़ते ढूंढ़ते मैंने खुदा को पा लिया’….झाले का..याला एकतर स्वतःचा तरी शोध लागला किंवा ईश्वराचा नाद तरी. पण त्यासाठी कारण काय होते? तर याला दुःखी व्हावे लागले…नुसते नाही तर पराकोटीचे दुःखी. आणि मग स्व-कर्तृत्वाची हतबलता पटली आणि मग शरण आला…नियती ला तरी किंवा देवाला तरी. पण त्यासाठी दुःख, वेदना आवश्यक आहे. वाटले म्हणून कोणी भक्त किंवा कलाकार बनत नाही…वेदना ही प्रत्येक गोष्टीमागचे मूळ असावी…नियती इतकी निष्ठुर का? ‘साक़िया जब मय हर मयकश के किस्मत में नहीं, सबको इस महेफिल में पैमाने अता क्यों हो गए?’ असे काही प्रश्न पडायला लागतात त्यासाठी.. आणि मग हतबलता जी म्हणालो ती अशी बाहेत येते – ‘खुदा की कायनात में मैने एक शख्स मंग, मुझे वही न मिला’…आणि मग वेदना सुरु होते…अर्थात गौतमासारखे ‘बुद्ध’ होणारे लोक विरळच…त्यांची वेदना विरहातून येत नाही. त्यांचे दुःख म्हणजे विश्वाचे आर्त…त्यासाठी ना शायराचे शब्द पुरेसे ठरतात ना कोणाची वाणी…