इंग्रजांची लंगोटी…

by Nikhil Sheth

(संस्कृती संस्कृती म्हणतात ते काय असते रे भाऊ?’ विचारून आणि क्रमश क्रमश करत निखीलने संस्कृतीपुराण पूर्ण केले. त्याच पुराणात अजून एक नवीन अध्याय – स्मित गाडे)

संस्कृती .भाषा,खाद्य,पोशाख,सण,उत्सव… या सर्व धाग्यांचे मिळून संस्कृती बनते. आपल्या आसपास जे काही असते आणि जे काही घडते ती आपली संस्कृती. ह्याचाच महत्वाचा एक भाग म्हणजे  आपली वस्र संस्कृती. जरा आजूबाजूला पहा. जीन्स,टी-शर्ट,फोर्मलस दिसतात चहुबाजूला. कुणी धोतर धारक दिसतंय की पहा बर. कुणी पारंपारिक मराठी धोतर घाला या साठी आंदोलन करताना दिसत  नाही बुवा मला तरी. (बहुराष्ट्रीय कार्यालयांमध्ये दर बुधवारी पारंपारिक धोतर आणि बंडी सक्तीची झालीच पाहिजे. ;) . असो विषयांतर होतंय ). का?आपण आपली संस्कृती रसातळाला जाऊ देतो आहोत का? आपण आपला मराठीपणा विकला आहे का? आपण पाश्चिमात्यांच्या आहारी गेलो आहोत का? आपण जरा मागे वळून पाहूयात..

सुरुवातीला भारतवर्षात वस्र हा प्रकार नेसणे ह्या प्रकारात मोडत असे. शिवण काम केलेले वस्र नव्हते. हळू हळू शिवण काम असलेले  वस्र आले. मुख्य प्रभाव पडले ते ग्रीक,कुशान , मुस्लीम आक्रमकांकडून. त्यानंतर महत्वाचा बदला घडतो तो इंग्रजांचे स्वामित्व प्रस्थापित झाल्यानंतर. आपल्याकडचे लोक सुटाबुटात फिरू लागतात. आणि हळूहळू आपण वेस्टर्न कपड्यांकडे  रोजचे वापरण्याचे महणून  पाहू लागतो. आता तर आपण इतके रुळलो आहोत की पारंपारिक कपडे फक्त  पाडवा, दिवाळी आणि कॉलेज मधल्या सांस्कृतिक दिन (traditional day) इथेच घालण्यासही असतात अशी आपली ठाम समजूत झाली आहे.

आता  ह्या बदलांची कारणमीमांसा दोन प्रकारे करता येईल -
१) सत्ताधीशांची मर्जी राखण्यासाठी किवा संपादन करण्यासाठी.बरयाच लोकांची समजूत असते की सत्ताधीशांचे अनुकरण केले की आ पणही त्यातला काही  भाग मिळवू शकतो. मग त्यासाठी लोक आपोआप  तिकडे ओढले गेले.आणि सगळे जण मग त्या भोवर्यात खेचले गेले. (आ ता मुख्य बदल झाला तो स्वातंत्र्यनंतर, तेव्हा आर्थिक वर्चस्वाने राजकीय वर्चस्वाची जागा घेतली ).
२) वेस्टर्न क्लोथ्स जास्त सोयीस्कर आहेत.
माझ्या मते दुसरे कारण जास्त महत्वाचे आहे.मग माझा विचार जरा पुढे जातो . जर आपल्या संस्कृतीचे महत्वाचे  एक  अंग असलेले वस्र आपण जर इतक्या सहजपणे, प्रतिकार न करता बदलतो तर संस्कृतीच्या इतर अंगांबद्दल इतके आग्रही का? बदल हा निसर्गाचा स्थायीभाव आहे. मग आपण मराठी भाषेबद्दल इतके आग्रही का?
मग मी विचार करतो की ह्या प्रश्नाचे उत्तर काय.. मराठी भाषेबद्दल आग्रह सोडावा? मध्ये राज ठाकरेंचे आंदोलन जोरात सुरु असताना वि.ग.कानिटकरांना  भेटायला गेलो होतो.मराठीचा  एवढा  मोठा लेखक पण  त्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले ‘मराठी भाषा उपयोगिता असेल तर टिकेल नाही तर काळाच्या ओघात वाहून जाइल.’ पहिले जरा वाईट वाटले  पण  मग हळू हळू सगळे कोडे सुटू लागले …
संस्कृती आपल्या अंगात भिनलेली असते. आणि जर माणसावर प्रभुत्व मिळवायचे असेल  तर त्याचावर वैचारिक प्रभुत्व मिळवणं महत्वाचे असते. आणि ह्या मानसिक लढाईत संस्कृती महत्वाची भूमिका बजावते.आपल्या भाषेवर जर त्यांचे वर्चस्व तर माझ्या संस्कृतीवर  आणि पर्यायाने माझ्या समाजावर नकळत त्याचंचे वर्चस्व येते. वर्चस्व  म्हणजे  मी त्यांची  भाषा बोलणे नव्हे , वर्चस्व म्हणजे मला माझी  भाषा कमी प्रतीची वाटणे. याच कारणासाठी  मला माझ्या संस्कृतीबद्दल अभिमान बाळगणे गरजेचे  आहे. संस्कृतीसाठी संस्कृती नाही तर माझ्या समाजाच्या स्वत्वासाठी  संस्कृती.त्याच्या उन्नतीसाठी संस्कृती. जर आपण हि आपल्या मनात गोष्ट ठेवली आणि आपल्या मनात हि जाण निर्माण झाली तर मग वस्र बदलले तसे सोय महणून भाषा बदलली आणि इतर गोष्टी बदलल्या तरी समाजाची  संस्कृती शाबूत राहील.मराठी लोक ताठ मानेने चालणे हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे.
(आता संस्कृतीत अनेक abstract गोष्टी येतात उदाहरणार्थ मुल्ये. आता ह्या गोष्टी भाषा,वस्र अश्या संस्कृतीच्या दर्शनी गोष्टींवर किती अवलंबून आहेत आणि जर दर्शनी गोष्टी बदलल्या तर त्या किती बदलतील हा विचार करण्याजोगा  मुद्दा आहे. माझे तरी मत आहे की फार फरक पडत नाही. पण प्रत्येकाचे ह्या abstrat गोष्टींबद्दल मत भिन्न असू शकत.( जरा पुरुषप्रधान लेख झाला खरा.साडी हा प्रकार अजुनही रूढ आहे.पण नऊ  जाऊन सहावारी आलीच ना. काष्टा  शहरात कोण मारता आज काल?? ))(बरेच कंस आणि त्याही कंसातले कंस झालेत. असो .)