आग जलनी चाहिये – क्रांतीकाव्य दुष्यंताचे
दुष्यंत कुमार.
नाव उच्चारताच समोर काय येते? अवघे ४२ वर्षांचे आयुष्य? आणि त्यातच केलेली हिंदी-उर्दु साहित्यातली अलौकिक कारागिरी? भारताला हा शापच आहे असे दिसते…निखिल बानर्जी, पन्नालाल घोष, केशवराव भोसले, सैगल, वसंत प्रभू, केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज… एक ना अनेक किती नवे घेऊ? यातला एक एक माणूस म्हणजे भारताला मिळालेले वरदान आहे खरं तर. पण त्यांचे आयुष्य? कसेबसे ५०-५५ वर्षे…यक्ष गंधर्वांची कामगिरीच अशी असते की त्यांची मनुष्यजन्माच्या शापातून लवकर मुक्तता होते. दुष्यंत कुमारही त्यातलेच एक. अवघे ४२ वर्ष जगले. पण तेवढ्याच अवधीत केलेली कारागिरी अशी बावनकशी आहे की काही बोलवतच नाही.
साने गुरुजींच्या मार्फत आपल्याला शाळेमध्ये क्रांती गीते म्हणजे काय ते कळले. साने गुरुजींच्या नंतरच्या काळात मराठी क्रांतीकाव्यामध्ये खूप फरक पडले. रादर ‘क्रांती’ ही संकल्पनाच बदलली,पण त्या गाण्यांमागाची बेहोशी तीच आहे. क्रांतीला सामाजिक संदर्भ असतात. वर्ग लढ्याचे ढोबळ स्वरूप तर कायम असते. शोषित-शोषक ही पार्श्वभूमी असते. हे झाले ऐतिहासिक सत्य. मग ती फ्रेंच राज्यक्रांती असो की रशिअन. चीन मधली असो की मेक्सिकोतली. पण ‘क्रांती’ चे स्वरूप त्याहूनही व्यापक आहे. अर्थ फार वेगळा आहे. तो नेमका दुष्यंत कुमार त्यांच्या एका प्रसिद्ध काव्यात पकडतात. त्यांचा एक संग्रह आहे. ‘सायेमे धूप’ म्हणून. अफाट फेमस आहे.
तेव्हा भारत किमान समाजवादाची स्वप्ने तर पाहत होता. त्याच्या पण वर्मावर बोट ठेवले आहे नेमके – ‘गिडगिडानेका यह कोई असर नही होता, पेट भरकर गालिया दो, आह भरकर बद्दुआ’ किंवा ‘भूख है तो सब्र कर, रोटी नही तो क्या हुआ, आजकाल दिल्लीमे है जेरेबहस ये मुद्दआ’
पण ही पोस्ट लिहिण्यामागची प्रेरणा म्हणजे त्यांचे विश्व-विख्यात काव्य. क्रांतीचे स्वरूप का वा कसे असावे, त्यामागची खरी प्रेरणा काय? आणि तिला सामाजिक संदर्भ जरी अटळ असले तरी त्यांच्याशिवाय सुद्धा क्रांती जगू शकते. क्रांती ही एक प्रकारची प्रोसेस आहे. जिला अंत नाही. जिच्या मागची प्रेरणा म्हणजे मनुष्याच्या जिवंततेची प्रेरणा. आणि दुदैवाने तिला संपूर्ण यश नाही. आणि म्हणूनच पुन्हा एकदा तिला अंत नाही. असो. दुष्यान्तांच्या ताजमहालाला आपल्या विटा नकोत. त्यांचे काव्यच लिहितो. खास करून शेवटच्या २ ओळी लक्षपूर्वक वाचा…अप्रतिम.
हो गयी है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए
आज ये दिवार पर्दों की तरह हिलने लगी, शर्त लेकिन थी की ये बुनियाद हिलनी चाहिए
हर सड़क पर हर गली में हर नगर हर गाव में, हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए
सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सारी कोशिश है की ये सूरत बदलनी चाहिए
मेरे सिनेमे नहीं तो तेरे सिनेमे सही, हो कही भी आग लेकिन आग जलनी चाहिए…
